Sunday, May 29, 2016

तुम्हाला नक्की कुठले सावरकर हवेत?

आज सावरकर जयंती निमित्त सगळीकडे अनेकांना सावरकरांची आठवण आल्याचे पाहून आनंद झाला.

सावरकरांची अनेक वैशिष्ठ्ये प्रत्येक लेखनातून दिसली. पण त्यातून सगळ्यांना फक्त राजकीय सावरकरच प्रिय आहेत असा निष्कर्ष निघाला. सावरकरांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख झालाच, मात्र तोंडी लावण्यापुरता. जेवण झाल्यावर तृप्तीची (देसाई नव्हे, पोटभरल्या नंतरची) ढेकर दिल्यावर स्तुती होते ती जेवणातल्या आमटी, भाजी, जिलबी, उसळ वगैरे पदार्थांची. लोणच्याशिवाय जेवण पूर्ण होत नसलं तरी लोणचं खूप छान होतं असं क्वचितच ऐकायला मिळतं. तद्वतच सावरकरांच्या सामाजिक कार्याचा जेमतेम उल्लेख झालेला दिसला.

राष्ट्रीय नेत्यांना आपण जातीजातीत विभागून टाकलं आहे असं म्हणतो, मात्र त्या त्या विभागणीत आणखी एक उपविभागणी झाल्याचं दिसून येतं. सावरकरांच्या बाबतीत बोलायचं तर ही विभागणी राजकीय सावरकर आणि सामाजिक सावरकर अशी झालेली आहे. मुद्दामून नव्हे, पण सोयीचं राजकारण आपणही अनेकदा खेळत असतो.

सामाजिक सावरकरांचं साहित्य वाचलं, तर कट्टर धार्मिक हिंदूंनाच काय, पण जहाल आंबेडकरवाद्यांच्या मेंदूला झिणझिण्या येतील अशी परिस्थिती आहे. पण आजची वास्तविकता काय आहे? एखाद्या राष्ट्रपुरुषाची समस्त मते आपल्याला पटलीच पाहीजेत असे नव्हे, पण निदान समजून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. राजकीय सावरकरांच्या आठवणींचे बोट धरून उड्या मारताना किमान सामाजिक सावरकर आपल्याला समजलेत का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची गरज आहे.

"संकटातून सोडवल्याबद्दल जर सत्यनारायण घालत असू तर त्याच सत्यनारायणाने आधी संकटात पाडलेच का याबद्दल त्याची जोड्याने पुजा करायला नको का?" हे वाक्य तात्यारावांचंच आहे. राजकीय सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या आत्ताच्या किती तथाकथीत हिंदूत्ववादी लोकांना हे झेपेल बरं? आपल्यात विरोधाभास आणि अजाणतेपणाने अंगी बाणवलेला दांभिकपणा इतका आहे की आज अनेक घरांत भींतीवर किंवा शोकेसमधे असलेल्या सावरकरांच्या फोटो खालीच सत्यनारायणाची पूजा मांडलेली दिसून येते. सामाजिक सावरकरांचा पराभव झाल्याचं याहून समर्पक उदाहरण कोणतं असू शकेल?

आज आपल्याला एखाद्या काँग्रेसी मंत्र्याने सावरकरांच्या ओळी पुसून टाकल्याचा राग येतो. भर संसदेत तात्यारावांच्या नावाचाही धड उच्चारही न करु शकणार्‍या तेव्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांंधींचा संताप येतो. पण ती त्यांची चूक नाही. त्यांना बालपणापासून अमुक लोक आपल्या सोयीचे म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आणि अमुक लोकांचा (उदा. सावारकर - तसंच उच्चार केला होता ना पप्पूने संसदेत?) आपल्याला राजकीय पोळी भाजायला द्वेष केलाच पाहीजे म्हणून त्यांना दूषणे द्यायची असंच शिकवलं गेलं आहे. तेव्हा त्यांच्या बरळण्याचा राग आला तरी ती आश्चर्याची गोष्ट नव्हे. आश्चर्याची गोष्ट ही की अजून आपल्यालाच सावरकर समजलेले नाहीत.

शक्यता कमीच आहे, पण उद्या काँग्रेसवाल्यांनी खरंच तात्यारावांचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येऊ नयेत ही काळजी घेणं आवश्यक आहे. नाही तर गांधींची तथाकथित तत्त्वं गुंडाळून ठेवणारे काँग्रेसजन आणि राजकीय सावरकर डोक्यावर घेऊन नाचणारे व सामाजिक सावरकरांना गुंडाळून ठेवणारे आपण यात फार फरक उरणार नाही.

आणि हो, राजकीय सावरकरांची बदलत गेलेली मते याचाही अभ्यास तरी किती जणांनी केला आहे हा देखील प्रश्नच आहे. समग्र इतिहासच नव्हे तर प्रत्येक इतिहासपुरुषाचाही अभ्यास असा वेगवेगळ्या परिप्येक्ष्यांमधून करावा लागतो. इतिहास हा २+२=४ असा कधीच नसतो. तसाच विचार करायची सवय असेल,तर किमान "त्यांना किनै आम्ही फॉलॉ करतो" असं पोकळ, दांभिक, आणि दिखाऊ विधान करुन आपल्या अकलेचं दिवाळं निघालेलं दाखवू नका. नाहीतर आपल्याला कित्ती कित्ती कळतं हे दाखवायला उठता बसता रामदास स्वामींच्या मूर्खलक्षणांचा उल्लेख करायचा आणि प्रत्यक्षात “समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण" हे आपल्या किती अंगी बाणलेलं आहे याचं जाहीर प्रदर्शन करायचं असं चालेलेलं असतं. तेव्हा कुठल्याही राष्ट्रपुरुषाला आपल्या अज्ञानाने असं अपमानित करु नका. त्यांच्या आत्म्याला क्लेष होतील.

हां तर आपला मूळ प्रश्न होता, तुम्हाला कोणते सावरकर हवेत? राजकीय की सामाजिक. आणि राजकीय हवे असतील तर्........जाऊ दे. आधी आपण पुरेसा अभ्यास करुया का?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ ३, शके १९३८
सावरकर जयंती