Friday, September 30, 2016

मी - एक हिंदुस्थान


मी सहावीत होतो तेव्हाची गोष्ट आहे. पाचवी झाल्यावर सहावीत माझी शाळा बदलली. मुंबईतल्या आम्ही राहत असलेल्या विक्रोळीतल्या विद्या मंदिर या शाळेतून नाव काढून दादरच्या हिंदू कॉलनी मधल्या तेव्हाच्या किंग जॉर्ज आणि नामांतर करुन राजा शिवाजी विद्यालय झालेल्या प्रतिष्ठित शाळेत मला घालण्यात आलं. नवी शाळा असल्याने आणि घरापासून चांगलीच लांब असल्याने बर्‍यापैकी बावरलेल्या अवस्थेत सुरवातीला मी वावरत असे. सुरवातीला ओळखी पाळखी झाल्या, पण त्याच बरोबर रॅगिंग हा प्रकारही सुरू झाला. मी अरे ला ल्गेच का रे करणारा असल्यामुळे तोंडी रॅगिंगला बरं तोंड देऊ शकत असे.

पण खरी गंमत सुरू झाली चित्रकलेच्या तासाला. पांढर्‍या शर्टावर मागे रंगांचे फटकारे दिसू लागले. रंग तसे निरुपद्रवी असल्याने लगेच धुतलेही जात, पण तरी दिवसभर रंगीत झालेला शर्ट घेऊन वावरणे ही अपमानास्पद बाब होती. पण हा प्रकार नेमकं कोण करतं याचा सुगावा लागलेला नव्हता, कारण मागच्याला विचारावं तर तो आपण या गावचेच नाही असा चेहरा करत असे. सगळे अनेकदा एकमेकांकडे बोट दाखवत असत. त्यामुळे शिक्षिकेला सांगितलं तर तिचा गोंधळ व्हायचा. हा प्रकार सहन केल्याने आधी नकळत तर मग मला जाणवेल अशा प्रकारे शर्ट रंगवला जाऊ लागला. मागच्याला आणि मागे बसणार्‍या इतरांना कडक इशारे वगैरे देऊन झाले. एक दोनदा हात उगारूनही झाला. पण जो पर्यंत मी प्रत्यक्ष बघत नाही तो पर्यंत कुणी दाद देईना. शाळा नवी असल्याने पटकन पंगा घेता येईना.

पण एकदा पाठीवर कुणीतरी ब्रश फिरवतंय अशी पुसटशी शंका आली आणि मी हळूच हातातल्या कंपासच्या आत दडवलेल्या आरशात बघितलं, तर मागचा मुलगा माझ्या शर्टावर चित्रकलेचे प्रयोग करण्यात गुंगून गेला होता.

मला नक्की काय झालं, कोण माझ्या अंगात संचारलं माहीत नाही.

पण अचानक माझा उजवा हात उचलला गेला, हाताची मूठ वळली गेली, मी गर्रकन् मागे वळलो आणि त्याच्या तोंडावर एक जबरदस्त ठोसा मारला.

तो मुलगा बेंचवरुन खाली कोपर्‍यात पडला. त्याचा एक दात तुटला होता, आणि तो भयंकर भेदरलेल्या चेहर्‍याने एकदा माझ्याकडे आणि एकदा आजूबाजूच्यांकडे बघत होता. माझा एकंदर अवतार बघता त्याला कुणाला सांगण्याची सोय नव्हती. ना शिक्षिकेला, ना वर्गातल्या इतरांना. कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार? मी शेण खाल्लं म्हणून मला शिक्षा झाली हे? ते काही असो, त्या ठोशानंतर माझ्या शर्टावरची चित्रकला बंद झाली हे खरंच.

काल जेव्हा भारतीय सैन्याने 'इनफ इज इनफ' म्हणत अतिरेक्यांची ज्या प्रकारे ठासली, तो काल मारलेला पाकिस्तानला ठोसा मला भूतकाळात घेऊन गेला. मी मारलेल्या ठोशाने त्या मुलाचा एक दात पडला, काल भारतीय सैन्याने मारलेल्या ठोशाने पाकिस्तानचे अडीचशेच्या आसपास दात पाडले. अजून बरेच पाडायचेत, पण एक मारा, लेकिन क्या सॉलिड मारा ना?

 - इनफ इज इनफ जोशी

© मंदार दिलीप जोशी


Friday, September 16, 2016

एका पुरोगाम्याचा कात्रज केला त्याची गोष्ट

पुरोगामी: मी माझ्या मुलीचं लग्न अमावस्येला रात्री बारा वाजता करणार आहे.

मी: अच्छा म्हणजे हा मुहूर्त आहे तर. बरं आहे सगळ्या निमंत्रितांना येता येईल.

पुरोगामी (आता चिडचिड सुरू झालेली आहे): मुहूर्तावर करायचं नाही लग्न म्हणून रात्री बारा वाजता करतो आहे.

मी: अहो म्हणजे शेवटी तो मुहूर्तच ना.

पुरोगामी (आता कपाळावर आठ्या स्पष्ट दिसू लागलेल्या आहेत): काहीही बोलू नका, अमावस्येला लग्न करुन काहीही अशुभ होत नाही हे मला दाखवून द्यायचे आहे.

मी: पण अमावस्या रात्री आठ बत्तीसला संपते आहे.

पुरोगामी (आता हा भडकला) म्हणून काय झालं?

मी: अहो रात्री बारा वाजता खरंच चांगला मुहूर्त आहे. रात्री ९ ते दुसर्‍या दिवशी पहाटे ५ पर्यंत शुभ काल आहे. झकास संसार होणार बघा तुमच्या मुलीचा.

पुरोगामी (पत्रिका माझ्या हातातून खेचून घेत): तुम्ही नाही आलात तरी चालेल.

मी: ख्या ख्या ख्या.

Wednesday, September 14, 2016

पंडित नामा ११ (अंतिम भाग): नदीमार्ग हत्याकांड

हा पंडित नामा मालिकेतला शेवटचा भाग. यात आपण काश्मीरी पंडितांच्या वेचून केलेल्या खूनांच्या दहा वेगवेगळ्या घटना बघितल्या. या भागात एका सामूहिक हत्याकांडाबद्दल आपण वाचणार आहोत. इथे फक्त दहाच अशा घटना वर्णन केलेल्या असल्या तरी अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत. नोंदवल्या न गेलेल्याही अशा अनेक घटना आहेत पण मुळात हिंदूंच्या जीवाला किंमतच कमी असल्याने त्यांचा शोध घेण्याची तसदीही कुणी घेतलेली नाही.

काश्मीरी पंडित - त्यांना इथून जायचं नव्हतं. पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दशतवाद्यांनी त्यांना निर्वासित व्हायला भाग पाडलं. गोळीबार आणि बाँबफेकीने घडवलेल्या अत्याचार व हत्याकांडांच्या प्रभावातून राहती घरंच नव्हे तर सरकारी इमारती व शाळाही सुटल्या नाहीत. त्यांच्या घरातल्या स्त्रीयांवर त्यांच्या डोळ्यादेखत अमानुष बलात्कार झाले. त्यांना हाल हाल करुन ठार मारण्यात आलं. आमची मुंबई, आमचं पुणं, हमारा इंदोर, नम्म बँगळुरू, आमार बांगला, आपणो गुजरात अशा अस्मिता बाळगणार्‍या तुम्हा आम्हांसारखंच त्यांचंही त्यांच्या जन्मभूमीवर प्रेम होतं, काश्मीरवर प्रेम होतं. तिथल्या हिरव्यागार गवताच्या प्रत्येक पात्यावर, शीतल व स्वच्छ जलावर, जमीनीच्या प्रत्येक इंच मातीवर त्यांचं नितांत प्रेम होतं. काश्मीर खोरं सोडताना त्यांना किती मानसिक क्लेष झाले असतील याची कल्पना कदाचित आपण कधीच करु शकणार नाही. प्रेमाने बायकोच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र असो वा घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले खानदानी दागिने असोत, कवडीमोल भावाने विकावे लागले...का?  फक्त जीव वाचवून पळून जाता यावं म्हणून. दिल में रखो अल्लाह का खौफ, हाथ में रखो कलाशनिकोव्ह यातल्या अल्लाहच्या खौफला दिलात ठेवायला काहीच आक्षेप नसणार्‍या पण दहशतवाद्यांच्या हातातल्या कलाशनिकोव्हच्या टप्प्यातून बाहेर पडता यावं म्हणून पळून जाताना काहींना बस, ट्रक, इत्यादी वाहने मिळाली तर इतर अनेकांना वेरीनागच्या बर्फाने आच्छादित धोकादायक पर्वतराजीला ओलांडून जवाहर बोगद्यापर्यंतचा प्रवास चक्क पायी करावा लागला.  

काश्मीरमधे या आधीही हिंदूंना इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं, या आधीही ते अनेकदा विस्थापित झाले होते. पण १९८९ च्या सुमारास सुरू झालेल्या या अत्याचारांच्या सत्राने मात्र काश्मीर खोर्‍याच्या लोकसंख्येची रचनाच संपूर्णपणे बदलून गेली. काश्मीर खोरं आता पूर्णपणे इस्लामबहुल झालं. 

काश्मीरात अतिरेक्यांनी घडवलेल्या सामूहिक हत्याकांडांपैकी तीन सगळ्यात भयानक समजली जातात. वंधामा इथे काश्मीरी पंडितांचे झालेले सामूहिक हत्याकांड, अनंतनाग जिल्ह्यातील छित्तिसिंगपुरा येथे २००० साली झालेल्या ३६ शीखांच्या हत्या, आणि २००३ साली नदीमार्ग येथे झालेले पंडित हत्याकांड ही ती तीन हत्याकांडे होत.

१९९० नंतर काश्मीर खोर्‍यात शिल्लक राहिलेल्या काश्मीरी पंडितांची संख्या नगण्य होती. पुलवामा जिल्ह्यातील शोपियान मधल्या नदीमार्ग येथे फक्त ५२ काश्मीरी पंडित राहत असत, ते ही चार कुटुंबांचा भाग होते. 

२३ मार्च २००३ च्या रात्री काही अतिरेकी नदीमार्ग गावात शिरले. अतिरेक्यांना गावात शिरताना पाहून'बंदोबस्तावरचे' पोलीस पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले. ते तिथे थांबले असते तरी परिस्थितीत काहीही फरक पडणार नव्हताच.अतिरेक्यांनी मशीनगनच्या जोरावर त्यांनी घराघरात शिरून जितक्या हिंदूंनाबाहेर काढता येईल तितक्या हिंदूंना फरफटतघराबाहेर काढण्यात आलं. यात साठी ओलांडलेल्या वृद्धांपासून ते जमेतेम चालायला शिकलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या पंडितांचा समावेश होता. सगळ्यांना एका ओळीत उभं करुन धडाधड गोळ्या घालण्यात आल्या. यात अकरा पुरुष, अकरा महिला व दोन लहान मुलांचा समावेश होता. सर्वात वृद्ध एक ६५ वर्षांचे आजोबा तर सगळ्यात लहान एक २ वर्षांचं मूल होतं.

काही फोटो देतो आहे. त्रास होईल. नाईलाज आहे.




त्या दोन वर्षाच्या निरागस मुलाची काय चूक होती? काय चूक होती त्या उरलेल्या २२ जणांचीही? पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या शाळेतल्या मुलांना पाकिसाननेच पोसलेल्या अतिरेक्यांनी ठार केलं तेव्हा अचानक मानवतेचा पुळका आलेल्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. 

पण खरं उत्तर एकच. ते हिंदू होते. काश्मीरी पंडित होते. बाकीच्यांप्रमाणे १९९०च्या दशकात पळून न जाता अजूनही काश्मीर खोर्‍यात राहत होते. अतिरेक्यांच्या व त्यांना नियंत्रित करणार्‍या त्यांच्या पाकिस्तानी मालकांच्या मते त्यांनी मरायलाच हवं होतं. 


या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांपैकी तीन अतिरेक्यांना मात्र मुंबई पोलीसांनी एका आठवड्याच्या आत म्हणजे २९ मार्च रोजी कंठस्नान घातलं. हत्याकांडात सहभागी असलेल्या एका चौथा अतिरेक्याला एप्रिल मधे अटक झाली. हा हल्ला पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेच्याच सदस्यांनी केल्याचं उघड झालं.

शासकीय पातळीवरुन पुढे काय झालं? केन्द्र सरकारने पाकिस्तानची 'कडी निंदा' केली. अमेरिकेने पाकिस्तानला नियंत्रण रेषेचा आदर करण्याची एक प्रेमळ टपलीत मारली. राज्य सरकारने 'आम्ही (उरल्यासुरल्या) पंडितांना संरक्षण देऊ त्यांनी काश्मीर खोरे सोडून जाऊ नये' असं पोकळ आणि तितकंच चीड आणणारं भंपक आश्वासन दिलं. 

आजही काश्मीरमधला हिंसाचार थांबलेला नाही. काफीर भारताला काश्मीरमधून पूर्णपणे हुसकावून लावणे हे पाकिस्तानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ताजा उसळलेल्या हिंसाचारा मागे राज्य सरकारमधे काफीर देशाच्या काफीर पक्ष असलेल्या भाजपचा असलेला सहभागामुळे उठलेला पोटशूळ आहे. बुरहान वानीचं मारलं जाणं हे फक्त निमित्त. त्यांना दार-उल-हरब (इस्लामच्या नियंत्रणात नसलेला) असलेला काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत देश हा दार-उल-इस्लाम मधे परीवर्तित करायचा आहे.

राज्यात ओतले जाणारे कोट्यावधी रुपये, पर्यटनामुळे मिळणारा महसूल, राज्य व केन्द्र सरकारी नोकर्‍यांत मिळणारे भरपूर आरक्षण आणि देशभरातकाश्मीरी विद्यार्थ्यांना मिळणार्‍या अमाप सवलती यांच्या बदल्यात जर सैन्यावर दगड आणि पेट्रोल बाँब फेकले जाणार असतील आणि रोज दंगली होणार असतील तर त्याला उत्तर हे गोळीनेच दिलं गेलं पाहीजे. भारत सरकारने आता काश्मीरी लोकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की भारतीय कायदे मानत नसाल आणि कायदा व सुव्यवस्था राखणार नसाल तर सरळ आपलं चंबुगबाळं उचला आणि तुमचे लाड होतील त्या देशात चालायला लागा, इथली एकही इंच जमीन आणखी मिळणार नाही. गंमत म्हणजे यांना हवी असलेली आझादी पाकिस्तानच्या ताब्यातल्या आझाद काश्मीरला पण हवी आहे. त्यांना पाकिस्तान पासून स्वातंत्र्य हवं आहे. गिलगीट-बाल्टीस्तानलाही स्वातंत्र्य हवं आहे. बलुचिस्तानही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाच आहे. तेव्हा सरकारने लवकरात लवकर पाकिस्तान तेरे टुकडे होंगे हा प्रोजेक्ट तडीस न्यायला हवा. 

पण सरकारने यंव करावं आणि त्यंव करावं या पेक्षा आपण काय करु शकतो याकडे लक्ष देऊया. आपल्या शेजारीपाजारी लक्ष ठेवा. काश्मीरी विद्यार्थी भाडेकरू म्हणून ठेवताना काश्मीरी पंडित वगळून कुणालाही जागा देऊ नका किंवा विकू नका. काश्मीरी पंडितांच्या मालकीचे दुकान असेल तर तिथून आवर्जून खरेदी करा व इतर काश्मीरी लोकांकडे आपला पैसा जाऊ देऊ नका. इतकंच काय तर काश्मीर खोर्‍यात पर्यटनालाही जाऊ नका. आपला पैसा हा कुठल्याही प्रकारे आपल्याच हिंदू बांधवांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्यांच्या व देशाच्या मुळावर उठलेल्यांच्या खिशात जाऊ देऊ नका. 

कारण आता फक्त सरकारवर निष्ठा ठेऊन ठेविले अनंते तैसेचि रहावे या चालीवर चित्ती समाधान ठेवून जगण्याचे दिवस गेले!

----------------------------------

या मालिकेसाठी मी अनेक संदर्भ वापरले. त्यात प्रामुख्याने दोन पुस्तकांचा समावेश आहे:

१) My Frozen Turbulence in Kashmir - लेखक श्री जगमोहन (भूतपूर्व राज्यपाल, जम्मू आणि काश्मीर)
२) Our Moon Has Blood Clots - राहुल पंडिता

यातले पहिले पुस्तक My Frozen Turbulence in Kashmir काश्मीर समस्येवरच्या माहितीसाठी सगळ्यात अस्सल स्त्रोत मानला जातो. जम्मू आणि काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल श्री जगमोहन यांनी त्यांच्या कार्यकालात राज्यात इतकं भरीव काम केलं होतं, की त्यांचे शत्रू देखील त्यांचे नाव आजही आदराने घेतात. आज काश्मीर आपल्या हातातून गेलेलं नाही याचं श्रेय या माणसाला जातं. त्यामुळे कुणाला काश्मीर समस्येवर काही वाचन करायचं असल्यास सगळ्यात आधी हे पुस्तक वाचा इतकाच सल्ला देऊन मी थांबणार नाही, तर ते विकत घ्या व संग्रही ठेवा असा माझा आग्रह असेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.

दुसरं पुस्तक Our Moon Has Blood Clots हेस्वतः एका काश्मीरी निर्वासिताने म्हणजे राहुल पंडिताने लिहीलेलं असल्याने ते सुद्धा वाचायला हवं. मात्र हे पुस्तक वाचून माझी निराशा झाली कारण लेखकाने त्यात बरंच पाणी घातलेलं आहे. इकडून तिकडून किस्से उचलून पुस्तकात टाकण्याचे चमत्कारही लेखकाने केलेले आहेत. कारण पुस्तकात असलेलेच किस्से इतर अनेक स्त्रोतात अधिक तपशीलातही सापडतात. राहुल पंडिताचा उल्लेख स्वतः अनेक काश्मीरी पंडितही आदराने करत नाहीत. राहुल पंडित यांची नक्षलवादाबद्दलची सहानूभूतीपर मते आणि आमीर खानची इंटॉलरन्सवरची इतरत्र केलेली भलामण विषयांतराच्या भीतीने इथे देत नाही. पण या उल्लेखावरुन वाचकवर्गाने काय ते समजून जावे. तरीही हे पुस्तक स्वतः एका काश्मिरी हिंदूने लिहीलेलं असल्याने किमान एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही. 

३) आंतरजालावरील काश्मीरी पंडीतांना वाहिलेली पाने व इतर आंतरजालीय स्त्रोत. 

४) ट्विटरवरील काश्मीरी पंडितांची खाती - यांचाही मी ऋणी आहे. ट्विटर आजकाल अनेक चांगल्या वाईट कारणांसाठी चर्चेत आहे पण शोधल्यास त्यावर माहिती आणि ज्ञानाचा खजीना सापडू शकतो. काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक गोष्टी तिथे सापडतात आणि अनेकांचे बुरखे टराटरा फाटतात.

५) ही मालिका लिहीताना वेळोवेळी मला प्रोत्साहन देणारा एक अनामिक मित्र. त्याच्याच विनंतीवरुन नाव गुप्त ठेवत आहे.

--------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी 
भाद्रपद  शु.१२/१३ शके १९३८

-------------------------------------------------------- 

Monday, September 12, 2016

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका

- Maria Wirth

या लेखाचं मराठी भाषांतर/रूपांतर:

हिंदूंनो कृपा करुन सर्व धर्म सारखे असं म्हणू नका
- मारीया वर्थ

ख्रिश्चन धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही, आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांच्याकडून ही निरीक्षणे आलेली आहेत. मारीया वर्थ ख्रिश्चन धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या तरी त्या हिंदू धर्मातला स्वातंत्र्य व मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रसंशक राहिल्या आहेत. हिंदू धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ठ पर्याय असताना काही हिंदू आपल्या हिंदू असण्याची जवळ जवळ लाज बाळगल्यासारखं करतात ही बाब मारीया यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहीली आहे.

आता वाचूया मारीया यांची निरिक्षणे:
हिंदू आधी म्हणायचे, "सर्व धर्म सारखे". दुर्दैवाने हिंदूंना एक तर हे दिसत नव्हतं किंवा दिसत असलं तरी मान्य करायचं नव्हतं की जगातले सगळ्यात मोठे दोन धर्म ही समानता मान्य करायला कधीच तयार नव्हते. हे दोन्ही धर्म म्हणतात, "आमचाच धर्म खरा. आमचाच देव हाच एकमेव सर्वशक्तीमान आणि खरा परमेश्वर." "सर्व धर्म सारखे" या गोष्टीवर विश्वास ठेऊन हिंदू धर्मीय त्यांच्या धर्माला ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या पातळी पर्यंत आणू इच्छितात ही ख्रिश्चन व इस्लाम धर्मीयांच्या दृष्टीने चेष्टेचा व दया दाखवण्याचा विषय होता. अर्थातच ख्रिश्चॅनिटी व इस्लाम अशा समानतेला कधीच मान्यता देणार नाहीत हे उघड होतं.

आता हिंदूंचं वृत्ती असते, "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हे आमच्या मुलांना शिकवतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम बाबत आमच्या मुलांच्या कानावर येतं असतं की हे दोन्ही धर्म किती छान आहेत. आम्हाला कुणाला दुखवायचं नसल्याने आम्ही मुलांना हिंदू धर्माबद्दल फारच कमी शिकवतो आणि जे शिकवतो ते फारच वरवरचं असतं - म्हणजे उत्सव आणि काही प्रथा वगैरे. आम्ही अजिबात खोलात जाऊन हिंदू तत्त्वज्ञान आणि आपल्या धर्माला असलेलं वैज्ञानिक अधिष्ठान या बाबत काहीच सांगत नाही. कारण एक तर मुळात आम्हाला त्याबद्दल काही माहीत नसतं आणि असलं तरी न सांगितलेलंच बरं कारण उगाच हिंदू धर्म सगळ्यात चांगला हे त्यातून स्पष्ट झालं तर इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील ना!"

लक्षात घ्या, हिंदू धर्मीयांना मुळातून हे समजूनच घ्यायचं नसतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे हिंदू धर्माचा आदर करत नाहीत. त्या धर्मांचे मौलवी आणि पाद्री हे हिंदूंना हे उघडपणे सांगत नसले, तरी स्वधर्मीयांना सतत सांगत असतात, की "आपल्या धर्मात आले नाहीत, आपल्या देवाचं अस्तित्व कबूल केलं नाही, तर हिंदू नरकात जातील. आपण त्यांना अनुक्रमे जीझस आणि आकाशातला बाप व मोहम्मद आणि अल्लाह यांच्या विषयी सांगूनही ते इतके जिद्दी आणि मूर्ख आहेत की त्यांच्या खोट्या देवदेवतांना ते अजूनही चिकटून आहेत. ही त्यांची घोडचूक आहे. पण गॉड/अल्लाह महान आहे. तो त्यांना त्यांच्या या चुकीची शिक्षा म्हणून असह्य नरकयातना देईल."

हिंदूंच्या "आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो" या मताचं एक प्रतिरूप म्हणजे "सगळे धर्म एक उत्तम आणि चारित्र्यवान माणूस कसं व्हावं हे शिकवतात आणि माणसाला त्याच्या निर्मात्याकडे नेण्याचा, म्हणजेच परमेश्वराची भेट घडवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात." म्हणून मग हिंदू सर्वधर्मीय चर्चासत्रांमधे भाग घेतात आणि सगळ्या धर्मांमधल्या समान बाबी शोधण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच काही समान बाबी आहेतच, पण त्या सापडल्या रे सापडल्या की हे हिंदू त्यावर समानतेचे ईमले बांधत सुटतात. "हो, सगळ्या धर्मात चांगल्या बाबी आहेत. हो, सगळ्या धर्मात चांगले लोक असतात". सगळे धर्म चांगल्या गोष्टी शिकवतात ही पोपटपंची हिंदूकडून इतक्या वेळा केली जाते जणू काही ही गोष्ट ते स्वत:लाच समजावत असावेत.

पण खरं सांगायचं झालं तर हिंदूंना कुठेतरी मनाच्या एका कोपर्‍यात हे ठावूक असतं की यात काहीही तथ्य नाही. हिंदूंना हे माहित असतं की ख्रिश्चॅनिटी व इस्लाम हे केव्हाच पथभ्रष्ट होऊन वेगळेपणाचा पुरस्कार आणि हिंदूंचा द्वेष करु लागले आहेत. या दोन्ही धर्मांनी नेहमी इतर धर्मीयांचा छळ केला आहे आणि असंख्य हुशार व चांगल्या व्यक्तींचा बुद्धीभेद करुन त्यांना अशा एका काल्पनिक परमेश्वरासाठी लढायला प्रवृत्त केलं आहे की जो त्याच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा आत्यंतिक द्वेष करतो. ख्रिश्चॅनिटी व इस्लाम या दोन्ही धर्मांचा इतिहास हा रक्तलांछित आहे. पण हिंदूनी आजवर याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं आहे. जवळ जवळ एक हजार वर्षांच्या दमनचक्रातून जाऊनही "उगाच का डिवचायचं कुणाला" ही घात करणारी भावनाच ते अजूनही जोपासत आहेत.

तुम्हाला असं वाटत नाही का की आता हिंदूंनी नागड्याला नागडं म्हणायला सुरवात केली पाहीजे? स्वामी विवेकानंद म्हणून गेले आहेत की एका हिंदूने त्याच्या धर्माचा त्याग करणे म्हणजे केवळ हिंदू धर्मात एक व्यक्ती कमी इतकाच त्याचा अर्थ होत नाही तर हिंदूंच्या शत्रूमधे एकाची भर असा त्याचा अर्थ होतो". स्वामीजींच्या मते ब्रिटीश राज्यात ख्रिश्चन व मुसलमान जनतेस श्रेष्ठत्वाची भावना जोपासण्यास सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जायचे.

या विरोधात हिंदूंना या विरोधात काहीही करता येईना कारण त्यांची बाजू घेऊन ब्रिटीश सरकारशी भांडायच्या ऐवजी त्यांचे अनेक आंग्लाळलेले नेते ब्रिटीशांच्या घातक शैक्षणिक धोरणामुळे जाणते किंवा अजाणतेपणाने हिंदुत्वाचा सातत्याने अपमान करण्यात गुंतलेले होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही हेच नेते सत्तेवर आल्याने तेच धोरण पुढे राबवले गेले. आता स्वातंत्र्याला एकोणसत्तर वर्ष झाल्यावर मात्र हिंदू धर्म म्हणजे काय हे जगाला उच्चरवाने व निर्भीडपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.

हिंदुत्वाचा अर्थ जगावर राज्य करणे नव्हे. हिंदुत्व म्हणजे कुठलाही पुरावा न देता पुढे रेटलेल्या एखाद्या अतार्किक समजूतीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःच्या धर्म तो बाळ्या आणि इतरांचं ते कार्टं हे सुद्धा नव्हे. तर हिंदुत्व म्हणजे शरीर व मनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने आपण कोण आहोत (आत्मन) याचा घेतलेला शोध होय. या भूमीतल्या प्राचीन काळच्या ॠषीमुनींना विविधतेमधे एकता म्हणजे काय याचा अर्थ केव्हाच कळला होता, अगदी पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांच्या खूप आधी. सुखतत्वाचा शोध कुठेही बाहेर घेणे उपयोगाचे नसते, तर हे तत्त्व आपल्या सगळ्यांच्यात (इतकेच नव्हे तर चराचरात) भिनलेले असल्याने त्याचा शोध प्रत्येकाने स्वतःमधेच घ्यायचा असतो. याचाच अर्थ आपण सारे एकाच इश्वरी तत्त्वाचा अंश आहोत. आपण सगळे एका विशाल कुटुंबाचा भाग आहोत. वसुधैव कटुम्बकम् - सगळ्या विश्वाला एक कुटुंब मानणारी ही धारणा सर्वसमावेशक आणि म्हणूनच अधिक स्वीकारार्ह नव्हे काय?!

- मारीया वर्थ

ता.क. मारीया वर्थ यांचा लेख वाचत असताना मला पु.ल.देशपांडे यांच्या म्हैस या कथेतल्या बगुनाना या व्यक्तीरेखेची आठवण आली. बगुनाना हे उस्मान शेठ या मुसलमान व्यक्तीरेखेच्या डब्यातले आमलेट खाताना, "तुम्ही काहीss म्हणाss उस्मानशेssssठ, सर्व धर्म सारखे." यावर कथाकथन ऐकत असलेल्या प्रेक्षकांत हशा उसळतो. पण यातल्या कळीच्या शब्दांकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. ते म्हणजे "तुम्ही काही म्हणा". उस्मानशेठ म्हणोत की न म्हणोत, आम्ही मात्र सर्व धर्म सारखे म्हणत त्यांच्या डब्यातलं आमलेट जिभल्या चाटत हाणणार. पण उज्जैनमधले मदरसे इस्कॉन मंदिरातून पुरवल्या जाणार्‍या दुपारच्या जेवणाला 'इस्लाम खतरे में हैं' ची आरोळी देत झिडकारतात त्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करणार.

अशा हिंदूंना एकच सांगावंसं वाटतं.....

आता तरी म्हणू नका सर्व धर्म सारखे.
म्हणणारे केव्हाच झाले जीवाला पारखे

काय समजलात?

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद शु. १०, शके १९३८

Thursday, September 1, 2016

पंडित नामा १०: ए. के. रैना

ए. के. रैना (एम.टेक., केमिकल इंजिनिअरिंग)
निवासः हंदवाडा
जन्मः ४ जून १९४६
हत्या: २० मार्च १९९०




बटा चालीव, मगर बटीने वरय

अर्थः सगळी पुरुष मंडळी काश्मीर सोडून जा, आणि तुमच्या बायका मुली मात्र मागे सोडून जा.

काश्मीरी पंडितांना फक्त या घोषणाच ऐकू यायच्या असं नव्हे, तर ज्यांच्या शेजारी ते वर्षानुवर्ष राहिले तेच मुसलमान शेजारी अगदी बायकापोरांसकट जोरजोरात मशीदीत या घोषणा द्यायला जमताना दिसायचे. हे दृश्य बघितल्यावर पंडितांचा धीर खचत चालला होता. इतका, की घरातल्या पुरुष दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडले किंवा त्यांना अतिरेक्यांनी गायब केलं तर मागे राहीलेल्या घरातल्या बायकामुलींची अब्रू सुरक्षित रहावी म्हणून जीव देण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरात रॉकेल, पेट्रोल, डिझेल, केरोसीन यापैकी जे मिळेल ते जसं साठवता येईल तसं आणि जिथे साठवता येईल तिथे साठवायला सुरवात केली होती. अर्थात किती जणींवर स्वतःला जाळून घेण्याची वेळ आली या संदर्भात काही तपशील उपलब्ध नाही. आणि ज्या कुणी जळून केल्या असतील त्यांच्यापैकी किती जणींनी स्वतःला जाळून घेतलं असेल आणि किती जणींना अत्याचार झाल्यावर जाळून टाकण्यात आलं असेल याबद्दलही काहीच माहिती उपलब्ध नाही. इतिहास जसा जेते लिहीतात तसा आपल्याला सोयीचा नसेल तो इतिहास जेते पुसूनही टाकतात याचा प्रत्यय काश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार शोधताना पुरेपूर येतो. तर, पाठीत वार करणार्‍या शेजार्‍यांबरोबरच जहाल इस्लामी मानसिकतेची लागण झालेले राज्यातले पोलीस दल आणि अतिरेक्यांबद्दल सहानुभूती असलेले अतिशय भ्रष्ट प्रशासन यांनी पंडितांना खोर्‍यात राहूच द्यायचं नाही असा चंग बांधला होता.

सरकारी सेवेत उच्चपदावरील काश्मीरी पंडितांच्या निवासाची, त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्ग व वेळांची इत्यंभूत माहिती त्यांचेच शेजारी व कार्यालयातील सहकारी अतिरेक्यांना पुरवत असत.

श्री ए. के. रैना हे असेच एक उच्चपदावर असलेले सरकारी नोकर. नियमितपणे येणार्‍या हिंदू सरकारी कर्मचार्‍यांच्या हत्येच्या बातम्यांनी ते विचलित नक्कीच होत असत. एकदा त्यांच्या एका मित्राची त्याच्याच घरासमोर करण्यात आली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला होता. काही दिवस काश्मीर खोरे सोडून मग परिस्थिती पुर्वपदावर आली की परत येऊ अशी चर्चा रैना यांच्या घरात चालत असे. पण श्री रैना पुन्हा पुन्हा एकच गोष्ट मुलांना बोलून दाखवत की, "मी कुणाचं काही वाईट केलेलं नाही, कुणाकडून एक छदामही लाच न मागता कायम प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत आलो आहे, मग माझं कुणीच काही वाकडं करणार नाही".

नियमित होणारे बाँबहल्ले व गोळीबार अशा अतिरेकी कारवाया, कधीही निघणारे मोर्चे, दगडफेक व इतर हिंसक घटनांमुळे तेव्हा संचारबंदी लागू होण्याचे प्रसंग वारंवार येत असंत. पळवलं जाण्याच्या भीतीने श्री रैना यांच्या मुलांचं शाळेत जाणं केव्हाच बंद झालेलं असलं तरी अन्नपुरवठा खात्याचे उपसंचालक असल्याने त्यांना स्वतःला मात्र कुठल्याही परिस्थितीत नोकरीवर हजर रहावं लागत असे. मग तो सरकारी सुट्टीचा दिवस असो किंवा रविवार. अगदी सणासुदीला सुद्धा त्यांना उपलब्ध रहावं लागत असे. त्यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तडकाफडकी सुट्टीवर जाणं शक्य नव्हतं. म्हणून रैना कुटुंबियांनी हळू हळू घरातल्या जीवनावश्यक वस्तूंच्या बांधाबांधीला प्रारंभ केला होता. कुटुंबियांना जम्मूला सोडून पुन्हा परत कामावर हजर व्हायचं अशी श्री रैना यांची योजना होती. त्यांचा मुलगा विकास यामुळे जरा खट्टू झाला होता, कारण त्याला समाजकार्याची प्रचंड आवड होती आणि जसं जसं वय वाढत जाइल तसं तसं ते वाढवत नेण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्या वेळी जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचं असल्याने ते तात्पुरतं बासनात गुंडाळून ठेवायला तो तयार झाला.

२० मार्चच्या सकाळी नेहमीप्रमाणे ध्यानधारणा व पूजाअर्चा संपल्यावर श्री रैना यांनी घरच्यांशी गप्पा मारल्या, भरपूर थट्टामस्करी केली व हसतमुखाने त्यांच्या कार्यालयात गेले. विवेकला पोटात दुखत होतं म्हणून तो परिचयाच्या एका डॉक्टरांकडे गेला आणि आल्यावर औषध घेऊन झोपून गेला. पण लवकरच त्याची झोपमोड झाली. अचानक दारावर थाप पडली आणि श्री रैना यांच्या ऑफिसात काम करणारा एक सहकारी रडत रडत घरात शिरला. श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत ही बातमी घेऊन तो आला होता. ताबडतोब विवेकचा मोठा भाऊ आणि त्याचा एक मित्र त्याच्या आईवडीलांना घेऊन श्री रैनांच्या ऑफिसात जायला निघाले. सगळ्यांना आशा होती की श्री रैना बाँबस्फोटात जखमी झाले आहेत म्हणजे ते अजून हयात आहेत आणि उपचाराअंती ते लवकरच बरे होतील. तिथे पोहोचल्यावर त्यांना जरासं वेगळं दृश्य बघायला मिळालं. कदाचित त्या वेळी झालेल्या आवाजांनी बसलेल्या धक्क्याने त्या सहकार्‍याचा नक्की काय घडलं याबाबत गोंधळ उडाला असावा. श्री रैना हे बाँबस्फोटात जखमी झालेले नव्हते तर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. श्री रैना यांच्या उजव्या हाताचं मधलं बोट एका गोळीने छाटलं गेलं होतं तर त्यांचा बळी छातीत घुसलेल्या दोन गोळ्यांनी घेतला होता. जागोजागी पसरलेलं रक्त आणि ऑफिसातलं फर्निचरची अवस्था या दोन गोष्टी काय घडलं असेल याची गोष्ट सांगत होत्या.  श्री रैना यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असताना त्यांनी टेबलाची ढाल करुन स्वसंरक्षणाचा पुरेपूर प्रयत्न केला होता. पण कलाशनिकोव्ह मधून सुसाट निघालेल्या गोळ्यांनी त्या टेबलाचा फार काळ निभाव लागला नव्हता हे उघड होतं.या हत्येला जबाबदार होता तो कुप्रसिद्ध अतिरेकी बिट्टा कराटे. श्री रैना त्यांना हॉस्पिटलमधे नेतानाच मरण पावले.

श्री रैना यांच्या ऑफिसातल्या सगळ्या मुस्लीम सहकार्‍यांना त्या दिवशी काय होणार आहे याची कल्पना होती असं नंतर समोर आलं. पण श्री रैना यांना योग्य इशारा देण्याची कुणीही तसदी घेतली नाही. एक काफीर कमी होतो आहे तर कशाला आपण मधे पडा असा विचार करुन सगळे गप्प बसले. ओठांवर अल्लाहचं नाव आणि कलाशनिकोव्ह घेतलेले त्यांना अधिक प्रिय वाटत होते हे उघड होतं.

आधी एका भागात आपण वाचल्याचं आठवत असेल तर बिट्टा कराटेचं यथावकाश 'पुनर्वसन' झालं, त्याने लग्न केलं आणि त्याला मूलंही झालं. थोडक्यात, अनेकांचा बळी घेतलेला नराधम आता कुटुंबवत्सल झाला. सौ चूहे खाके बिल्ली चली हजको या म्हणीआ उगम नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही, मात्र ही म्हण अनेकांचे संसार उध्वस्त करुन मग स्वतः संसारात 'सेटल' झालेल्या अशाच हरामखोरांना बघितल्यावर निर्माण झाली असावी.

रैना कुटुंब एक अत्यंत सुखी कुटुंब होतं. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असणारी ही मंडळी शांतपणे आपलं आयुष्य कंठत होती. संध्याकाळी जमल्यावर दिवसभरात काय काय झालं ते सगळं मुलं त्यांच्या वडिलांना म्हणजे श्री रैना यांना सांगायची आणि वडील त्यांच्या कार्यालयात घडणार्‍या गंमती जमती घरच्यांना सांगत. दोन्ही मुलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. असं एक आनंदी शांततप्रिय कुटुंब बिट्टाने उध्वस्त केलं.

श्री रैना यांच्या हत्येनंतर इतर पंडित कुटुंबांप्रमाणेच रैना कुटुंबियही जम्मूला स्थलांतरीत झाले. रैनांच्या पत्नीला तब्बल पाच वर्षांनी पेन्शन मंजूर झालं, कारण त्याही तेव्हा सरकारी सेवेत होत्या. त्यांची बदली जम्मूला करण्यात आली होती. विवेकला जम्मूतल्या स्थानिक सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला तर कालांतराने त्याच्या मोठ्या भावाने पटना  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रैना कुटुंबियांचा चरितार्थ व नातेवाईकांच्या मदतीने मुलांचे शैक्षणिक प्रवेश व नंतरचे शिक्षण जरी सुरळीत चालू झाले असले तरी त्यांना बसलेला मानसिक धक्का जबरदस्त होता. आर्थिक नुकसान भरुन काढता येतं. पण मनाला झालेली खोल जखम अनेक दिवस ठसठसत राहते. एकेमेकांना घट्ट धरुन राहणार्‍या रैना कुटुंबियांना काय धक्का बसला असेल याची आपण कदाचित कल्पनाही करु शकणार नाही. विवेक म्हणतो "बदला घेण्याची भावना मला कधी कधी रात्र रात्र झोपू देत नसे."

पण इतर अनेकांप्रमाणेच विवेकनेही झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायला हातात बंदूकच काय, साधा दगडही नाही घेतला. त्याच्या गुरूच्या सल्ल्याने विवेकने यंग्स इंडिया ही सेवाभावी संस्था सुरु केली. निर्वासित काश्मीरी पंडित व इतर सर्वांसाठी पर्यावरण विषयक, ग्रामस्वच्छता, पाण्यासाठी हँडपंप बसवून देणे, काश्मिरी पंडित युवकांना नोकरीसाठी सहाय्य करणे, या कामांपासून ते सरकारी कामात गोरगरीबांना  सहाय्य करणे इथपर्यंत ही संस्था काम करु लागली. या संस्थेने पार युनिसेफबरोबर काम करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. विवेकचं म्हणणं आहे की "मला मित्रासारख्या असलेल्या परमप्रिय वडिलांच्या हत्येनंतर मी चुकीच्या मार्गाला लागू शकलो असतो. पण मी तसं न करता सकारात्मकतेकडे वळलो आणि माझं आयुष्य बर्‍यापैकी सुखकर झालं."

हे बरोबर की चूक माहित नाही. पण विवेकसारखे अनेक आहेत ज्यांच्यापैकी कुणीही बदला घ्यायला हिंसेचा मार्ग स्वीकारलेला नाही.

पण हे धर्माच्या नावावर हिंसेचा नंगानाच घालणार्‍यांना कोण समजावणार? अल्लाहला न मानणारे काफीर आहेत आणि काफीरांना ठारच मारलं गेलं पाहीजे या भावनेने ग्रस्त असलेल्यांना कोण समजावणार? आणि आपली काहीही चूक नसताना आपल्या जीवावर उठलेल्यांना चर्चेने नव्हे तर गोळीनेच उत्तर द्यायचं असतं हे तरी सत्तेतल्या लोकांना कोण समजावणार?

---------- काही मनातले ----------

आत्तापर्यंतचे दहा भाग वैय्यक्तिक हत्त्यांची गोष्ट सांगणारे होते. त्यानंतरचे एक किंवा दोन भाग सामूहिक हत्याकांडांवर आधारित असतील. त्यानंतर ही मालिका संपेल. ही मालिका लिहायला सुरवात करताना अमुक भाग लिहावेत असं ठरवलेलं नव्हतं. काश्मीरमधे अतिरेकी बुरहान वानीला सैन्याने संपवल्यानंतर उसळलेल्या पण आधीपासून व्यवस्थित पूर्वतयारीकरुन सुरु झालेल्या हिंसाचाराने हे लिहायला मला भाग पाडलं असं म्हटलं तरी चालेल.

ही मालिका लिहीत असताना मला अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. मी काही फार मोठा लेखक नाही, मला जे मनापासून भावतात त्या विषयांवर मी लिहीतो इतकंच. 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।। या समर्थवचनांचं जितकं शक्य होईल तितकं पालन मी करतो. तेव्हा माझ्या लेखनकौशल्याबद्दलच्या कौतुकपर टिप्पण्यावगळून बाकीच्या गोष्टींकडे वळतो. मुळात या विषयावर तू लिहीतोस याचंच कौतुक आहे असं एका जाणकाराने मला सांगितलं. तसंच तुमच्या या मालिकेमुळे बर्‍याच माहित नसलेल्या गोष्टी समजल्या अशा अनेक प्रतिक्रिया आहेत. माझे बरेच गैरसमज होते ते दूर झाले असंही एका व्यक्तीने सांगितलं.

या उलट "हे लिहून काय होणार, 'हा मेला, ती मेली' या माहितीचा फायदा काय?" अशीही एक अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया एका व्यक्तीकडून मिळाली. त्यात त्या व्यक्तीचा दोष नाही. मुळात आपल्यात राष्ट्रीय चरित्र हीच गोष्ट नव्याने निर्माण करायला हवी आहे. इस्लामी दहशतवाद हा आतासारखा आपल्या दारापर्यंत यायलाच हवा असं नाही. ज्याप्रमाणे आपल्या पायाला ठेच लागली की तोंड वेदनेने कळवळतं, डोळ्यांतून पाणी येतं, आणि हात लगेच पायाच्या मदतीला धावतो, त्याप्रमाणे देशात कुठेही घडणार्‍या अशा घटनांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया झाली पाहीजे. अगदी रस्त्यावर उतरून निदर्शनं करणं जमलं नाही तरी चालेल पण आपापले कामधंदे सांभाळूनकरता येण्याजोगी अनेक कामं आहेत. उदाहरणतः सरकारला पत्र पाठवणं, ज्या लोकांकडून आपल्या जवानांचा अपमान होतो त्या लोकांकडून काहीही खरेदी न करणं, आपल्या जवळपासच्या अशा गरजूंना मदत करणं, आपल्यापैकी जे उत्तम लेखन करु शकतात त्यांनी या विषयावर लेखन करुन जनजागृती करावी, अशी अनेक कामं आपण नक्कीच करु शकतो.

प्रश्न उरला मी का लिहीतो याचा. एका व्यक्तीने मला विचारलं होतं, तुला या लिखाणाचा त्रास होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना अरनेस्ट हेमिन्गवे या लेखकाचं एक वाक्य आठवलं: "Write hard and clear about what hurts". माझ्या आजूबाजूला आणि देशात काय चाललंय याचा मला त्रास होतो म्हणूनच मी लिहीतो. दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर लिहीलं नाही तरच मला त्रास होईल.

आता शेवटच्या भागात लवकरच भेटूया. तेव्हा संदर्भांचीही यादी देईन.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

श्रावण अमावस्या, बैल पोळा, शके १९३८
१ सप्टेंबर इसवी सन २०१६
--------------------------------------------------------