Thursday, January 28, 2016

महाबोअर 'नटसम्राट'

मी: "मला 'नटसम्राट' आवडला नाही"

एक दर्दी: "तुम्हाला तो कळला नसेल"

कळला नसेल?

एक सर्कीट, शिवराळ, आणि दारूडा नाटकवाला थेरडा निवृत्त झाल्यावर आपली सगळी प्रॉपर्टी मुलांत वाटून टाकतो आणि मग स्वतःच्याच कर्माने लागोपाठ दोघांनीही घराबाहेर पडायला भाग पाडल्याने रस्त्यावर येतो, मधेच त्याची बायको खपते, आणि मग शेवटी तो मरतो. वगैरे वगैरे.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

साध्वी प्राची किंवा आदित्यनाथ का कोण यांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केल्यावर बरखा दत्त जसा थयथयाट सुरू करते आणि अर्णब गोस्वामी कानठळ्या बसवणार्‍या आवाजात त्याचं ते जगप्रसिद्ध "नेशन वॉन्ट्स टू नो" नामक तांडव सुरु करतो तशीच चिडचिड मला "नटसम्राट हा चित्रपट माझ्या मते टुकार सिनेमा आहे" हे सडेतोड आणि निर्भीड वक्तव्य केल्यानंतर अनेकांकडून अनुभवायला मिळाली.

शाहरुख खान ने देवदासची भूमिका केलेल्या चित्रपटाबद्दल जुन्या देवदासमधे पारोची भूमिका केलेल्या वैजयंतीमालाचं मत विचारल्यावर तिने "Dilip Saab played the role of Devdas, Shahrukh was Shahrukh as usual" असं  मत व्यक्त केलं होतं. अर्थात ती जुन्या आणि नव्या दोन्ही चित्रपटांचीच तूलना होती. इथे जुनं नाटक आणि त्यावर आधारित सिनेमा आहेत हे लक्षात घेतलं तरी त्यामागचा अर्थ बदलत नाही. म्हणून जुनी मंडळी कदाचित त्याच सडेतोडपणे 'श्रीराम लागू प्लेड द रोल ऑफ अप्पासाहेब बेलवलकर अ‍ॅन्ड नाना पाटेकर प्लेड नाना पाटेकर अ‍ॅज युज्वल' असं म्हणाली, तर त्यांचं हे मत किमान या सिनेमापुरतं सत्यापासून फार दूर नसेल. चित्रपटात कुठेही अप्पासाहेब बेलवलकर न दिसता प्रत्येक दृश्याच्या प्रत्येक फ्रेममधे नाना पाटेकरच दिसत राहतो.

इथे मी 'नटसम्राट' हे नाटक आणि सिनेमा यांची तूलना करत नाही. ती मी कट्यारच्या वेळीही केली नव्हती आणि इथेही करणार नाही. कारण दोन्ही नाटकं न पाहिलेल्या भाग्यवान लोकांत मी मोडतो. भाग्यवान अशासाठी की कट्यार काळजात का घुसली नाही या विषयी नाटकाचे दर्दी असलेल्या लोकांकडून टीकात्मक लेख वाचलेले आहेत. नाटक पाहिल्यामुळे अपरिहार्यपणे होणारी ती तूलना इथे आपसूक टाळली गेली. त्यामुळे म्हणा किंवा तरीही म्हणा, एक स्वतंत्र सिनेमा म्हणून मला तो आवडला. नटसम्राटच्या बाबतीत मात्र तसं इथे झालेलं नाही. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. बर्‍याच वर्षांनी काहीतरी जबरदस्त गंभीर अनुभवायला मिळेल असं वाटलं होतं. या आणि इतर अनेक अपेक्षा पूर्ण तर झाल्या नाहीतच पण घोर निराशा पदरी पडली.

एक तर आईवडिलांनी म्हातारपणीचं आर्थिक नियोजन करताना मुलांना स्वतःच्या मृत्यूआधीच सगळी संपत्ती देऊन टाकणे आणि मग मुलांनी त्यांना देशोधडीला लावणे ही संकल्पना असलेले निव्वळ मराठीतलीच असंख्य नाटकं, चित्रपट, आणि मालिका किंवा त्यातली उपकथानके हे आजच्या प्रेक्षकांनी पाहीले आहेत. त्यामुळे तो विषय सादर करुन 'अरेरे गरीब बिच्चारे आई-वडील' दाखवून प्रेक्षकांकडून अश्रू वसूल करणे हे म्हणजे मराठी चित्रपटाला किमान २५ वर्ष मागे नेऊन ठेवण्यातला प्रकार आहे. आता हे मागे नेऊन ठेवणे म्हणजे काय आणि तुमच्या मते पुढे येणं म्हणजे काय ते विचारु नका. लेख लिहीताना एक छान वाक्य म्हणून लिहीलं ते. अगदी या चित्रपटात असलेल्या अनेक गोष्टींसारखंच.

संपूर्ण चित्रपटभर नाना पाटेकर एका अत्यंत विचित्र सुरात संवादफेक करतो. त्यामुळे त्याचे संवाद ऐकताना रॉबिन विल्यम्सच्या Cricket is basically baseball on valium या वक्तव्याची आठवण येते. नटसम्राट इज नाना पाटेकर ऑन ड्रग्स. तुम्हाला आठवत असेल तर राजेश खन्नाने 'अमर प्रेम' या चित्रपटात अशीच कंटाळवाणी संवादफेक केली होती. माणूस दारुडा किंवा म्हातारा दाखवायचा असेल तर अशा प्रकारे ड्रग्सच्या अंमलाखाली असल्या सारखा सूर लावायलाच हवा का?

चित्रपटाचं कथानक हे नेहमी वाहतं असायला हवं. तो फ्लो इथे कुठेही आढळत नाही. चित्रपटातलं प्रत्येक महत्वाचं दृश्य (किंवा कोणतंही दृश्य घ्या हो, शेणच खायचं असेल तर त्याला प्रेफरन्स असतो का? की बुवा गायीचं चांगलं आणि बकरीचं वाईट?) हे दिग्दर्शकाने नानाला "हां, तर बरं का नाना, आता पुढचा सीन असा असा आहे' हे सांगितल्यामुळे नानाने होज्जाओ शुरू म्हणत केल्यासारखा वाटतो. अगदी "कुणी घर देता का घर" हा संवाद असलेलं दृश्य सुद्धा अपेक्षित परिणाम साधत नाही. त्या जागी नानाने यशवंत मधला "एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजडा बना देता है...." हा लांबलचक संवाद म्हटला असता तरी मला कळलं नसतं इतका मी हे दृश्य येईपर्यंत बधीर झालो होतो. त्यामुळे जिथे हा चित्रपट भिडायला हवा, तिथे तो मला जाम बोअर वाटायला लागला. चित्रपट 'नटसम्राट' हे नाव देऊन न काढता 'नानाची ठिगळं' या नावाखाली एखादी डॉक्युमेंटरी म्हणून काढला असता तरी चाललं असतं असा एक विचार चमकून गेला.

आता जरा पुन्हा कथानकाकडे वळूया. म्हणजे मी वळतो. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला चित्रपट बघताना तो पर्याय नव्हता, तुम्हाला हे वाचताना आहे. तर, जाणार्‍यांना अच्छा टाटा.

पण थांबा. चित्रपट तिकीट विकत घेऊन बघितला असेल, हा लेख फुकट आहे. तेव्हा वाचाच.

तर, नाटकात काम करणारा अत्यंत उत्तम नट, ज्याला त्याच्या अभिनयामुळे नटसम्राट ही पदवी देण्यात आलेली आहे, तो एके दिवशी 'कुठेतरी थांबायचं' म्हणून निवृत्त होतो. (पचतंय का? अभिनय म्हणजे क्रिकेट आहे का सुनिल गावसकर सारखं जमतंय तो पर्यंत रिटायर व्हायला? तो सत्तरीचा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला अँग्री यंग मॅन स्वतःचा मुलगा ओल्ड मॅन व्हायला टेकला तरी अजून चित्रपट, जाहीरात, टिव्ही कार्यक्रम एक ना दोन अनेक प्रकारात काम करतो आहे, अशा जमान्यात वावरणार्‍या प्रेक्षकांनी हा आउटडेटेड अप्पासाहेब बेलवलकर का चालवून घ्यायचा? पण ते असो.).

अशा प्रत्येक दृश्याचं पोस्ट मॉर्टम करत बसलो तर दिवस जाईल हे लिहीण्यात. ठीकाय ब्वॉ, व्हायचं असेल कुणाला रिटायर, आहे ब्वॉ तसं कथानक, आपल्याला काय.

तर, नाटकात काम करणारा एक सर्किट आणि अट्टल बेवडा थेरडा दारूच्या नशेतच मूर्खासारखं स्वतःची प्रॉपर्टी मुलगा आणि मुलीत वाटून टाकतो. मुलाला घर आणि मुलीला पैसे वगैरे.

बरं मुलाबरोबर सून आणि नात यांच्या बरोबर गपगुमान रहावं तर ते ही नाही. लहान वयाच्या मुलीला कविता शिकवता शिकवता अर्वाच्य शिव्या शिकवतो आणि तोंड वर करुन त्याचं समर्थनही करतो. कोणते आजोबा आपल्या नातवंडांना अशा घाणेरड्या शिव्या शिकवतात? अगदी गॅरेजवालेही आपल्या घरात नातवंडांशी बोलताना खूप जपून बोलत असतील. नाटकवाला ही पार्श्वभूमी दाखवली की त्याच्या नावावर काय वाट्टेल ते खपवता येतं अशी संबंधितांची समजूत आहे का?

या वरुन त्याच्यात आणि सुनेत झालेल्या वादाचं पर्यवसान त्याने घर सोडण्यात आणि मग मुलीकडे जाण्यात होतं. तिथे तो दारूच्या नशेत पार्टीत तमाशा करतो आणि जावयाच्या बॉसच्या मुलाच्या नाटकावर गरळ ओकतो. अरे शोन्या, सुखानं जगायचंय ना? पण ते नाही. आम्ही नाना पाटेकर आहोत किनै? मग थयथयाट करायलाच हवा!

समाजातला खोटेपणा सहन होत नाही, मग मुखवटे घालून घालून वावरायचं नाही म्हणत सगळे शिष्टाचार सोडून स्वतःच्याच घरच्यांशी मन मानेल तसं वागायचं स्वातंत्र्य घेणं हे कितपत बरोबर? किंबहुना या चित्रपटातल्या अप्पासाहेबाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच समजत नाही आणि मग त्याच्याबरोबर चित्रपटही वाहवत जातो.

मग बहुतकरुन वेळ जात नाही म्हणून एकाकीपणाला कंटाळलेल्या स्वतःच्याच मित्राचा त्यानेच सांगितलं म्हणून झोपेच्या गोळ्या देऊन खून करतो (आपण नसता केला, मित्राने सांगितलं तरी) आणि वर त्याचंही समर्थन करतो.  मग चोरीचा आळ घेतला म्हणून मुलीच्या घरातूनही बाहेर पडतो आणि त्याची बायको रस्त्यातच कुठेतरी मरते आणि हा पुलाखाली वन-पूल-किचन ची खोली असल्यागत, हक्काची (आणि सेक्युलर) स्वयंपाकीणबाई असलेल्या जागेत राहू लागतो. आणि मग एक दोन दॄश्यांनंतर मरतो. सिनेमा खतम, पैसा (थेटरवालेको) हजम. जा घरी.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

एकंदरीत चित्रपटात ठायी ठायी दिग्दर्शक आपल्याला "वि.वा.शिरवाडकरांच्या अजरामर (हॉss हॉss हॉss हॉssहॉss)*** नाटकावर आधारित आहे आणि त्यात नाना पाटेकर आहे म्हणून चालवून घ्या" असा दम भरत असल्याचा भास होत राहतो. नाना आहे म्हणून आवडून घ्यायचा असेल तर मग 'यशवंत' काय वाईट होता? अमिताभ बच्चन आहे म्हणून 'लाल बादशाह' आवडून घ्यायचा का? आँ? अरे बैल समजता का प्रेक्षकांना तुम्ही? कुणी उत्तर देता का उत्तर?

वास्तविक, आवडलेल्या सिनेमावर लिहीणे आणि न आवडलेल्यावर वेळ व शक्ती वाया न घालवणे हा माझा मी स्वतःवरच घालून घेतलेला नियम. त्याला मी का मुरड घातली? तर चित्रपट आवडला नाही कारण तो "तुम्हाला समजला नसेल" या अतार्किक आरोपामुळे.

पुन्हा सांगतो, नटसम्राट हा एक अत्यंत, प्रचंड, महाभयानक बोअर सिनेमा आहे. कुणी फुकट दाखवला तरी बघू नका. नाना पाटेकरच बघायचा असेल तर क्रांतीवीर बघा.

--------------------------------------------------
*** इथे मी पाताळविजयम या मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉss हॉss हॉss हॉssहॉss असं का हसलो ते कृपया विचारू नका. उत्तर आवडणार नाही.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ४, शके १९३७
--------------------------------------------------



Monday, January 18, 2016

असा मिडिया मिडीया...

होई कांड दादरीचं, मिडीयाला लागे घोर |   
जवा घडते मालदा, म्हणे भुरटा तो चोर ||

करी दादरी दादरी, त्याले शिक्षा करी कोन |  
उभा जाळला मालदा, डोळे वटारी ना कोन ||

दीदी जेहादी जेहादी, तिचं न्यारं ते तंतर | 
पाकी अतिरेकी बरे, त्याले गोळीचा मंतर ||

दीदी गुलाम गुलाम, अली गातोया गझला |
मालद्यात दंगेखोर, जाळी मजला मजला ||

आले कसाई कसाई, झाला मुर्दाड कायदा |
आमच्या दीदीले हिरव्या, मिळे मतांचा वायदा ||

मारी कोकरू कोकरू, म्हणे भावना धार्मिक |
झुंज बैलांशी करता, मिडीयाले होतो शोक ||

क्रूर मानूस मानूस, मुके बैल झुंजवले |
मुल्ला दयाळू दयाळू, त्याले खाऊन टाकले ||

देवळात नको बाई, तरी आम्ही जानारच |
ब्रह्मचार्‍याच्या कुटीत, गोंधळ होनारच ||

असा कसं हे मिडिया, त्याले डोकं गुडघ्यात | 
पैकं खाऊन इकतो,  इये देशाची इज्जत ||

--------------------------------------------------
...बहिणाबाईंची क्षमा मागून.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ९, शके १९३७
--------------------------------------------------

आशापुरा माईनिंग कंपनीकडून कोकणातल्या पर्यावरणाला धोका


Tuesday, January 12, 2016

माध्यमवेश्यांचा नंगानाच


गालिब अब्दुल गुरू. अर्थात फाशी गेलेला अतिरेकी अफझल गुरूचा मुलगा. त्याला जम्मू-काश्मीर बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळाल्यावर माध्यमवेश्यांना आनंदाच्या उकळ्याच्या उकळ्या फुटल्या आहेत. जणू अफझल गुरूचीच फाशी रद्ध झाली असावी किंवा तो मरणोत्तर निर्दोष सिद्ध झाला असावा. जणू अब्दुल गुरूची गुणपत्रिका ही अफझल गुरूला व त्याच्या कुटुंबियांना मिळालेले देशभक्तीचे सर्टिफिकेटच होय. जणू अफझल गुरू हा कुणीतरी संत महात्मा असावा किंवा किमानपक्षी अतिरेकी नसावाच. टाईम्स ऑफ इंडियाने तर अफझल गुरूचे छायाचित्र आणि भोवती फासाचा दोर अशा फोटोच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मुलाचा अब्दुल गुरूचा फोटो टाकून अफझल गुरूला तर भगत सिंगचा दर्जा देऊन टाकला. जेमतेम आठवडाभरापूर्वी झालेला पंजाबातल्या पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यातल्या अतिरेक्यांनी "आम्ही अफझल गुरूच्या हत्येचा बदला घ्यायला आलो आहोत" अशा आरोळ्या ठोकल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही क्षुल्लक बातमी मोठी करुन दाखवताना माध्यमवेश्यांना फुटलेल्या उकळ्या अधिकच संशय निर्माण करतात.

 


हे लोक स्वतःच्या मुलांचे निकाल पाहूनही इतके आनंदीत होत नसावेत. ज्या संसदीय लोकशाहीचे हे बातमीविक्रेते उठता बसता गोडवे गात असतात, त्याच लोकशाहीचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला जबाबदार असलेल्या एका अतिरेक्याच्या पोराबाळांविषयी इतका पुळका? संसदेचे संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या पोलीसांच्या घरच्यांची चौकशी केली आहे का यांनी कधी? संसदेबाहेर अतिरेक्यांना पहिल्यांदा बघणारी आणि इतर पोलीसांना सावध करणारी हवालदार कमलेशकुमारी यादव या अतिरेक्यांची पहिली बळी ठरली तिच्या घरी बरखा दत्त गेली आहे का कधी? राजदीप सरदेसाईला अफझल गुरूच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे याचं केवढं कौतुक, त्याला बघितलंय कधी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १४ लोकांच्या (त्यातले ६ पोलीस) आणि  २२ जखमी लोकांच्या घरी जाऊन चौकशी करताना? त्यांची मुलंबाळं कुठल्या शाळाकॉलेजात शिकत आहेत, त्यांचे मार्क किती, त्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी काही मदत हवी आहे का हे प्रश्न इतकी वर्ष या पत्रकार मंडळींना का पडले नाहीत? राजदीपपत्नी सागरीकाचाही त्यांच्या कुटुंबियांसाठी जीव का कळवळला नाही?

मुंबई बाँबस्फोट खटल्यात फाशी गेलेला याकुब मेमन हा चार्टर्ड अकाउंटंट होता. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे त्यांच्या सुदैवाने मॉर्निंग वॉकला जे कधीच जात नाहीत, ते लोकसत्ता नामक तथाकथित वृतपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांच्या भाषेत 'सनदी लेखपाल'. अतिरेकी हल्ल्यांच्या मागे असलेल्या, म्हणजे मास्टरमाइंड असलेल्या  अतिरेक्यांची शैक्षणिक पात्रता पहा. आयटी व्यवसायिक, सॉफ्टवेअर अभियंता, डॉक्टर,  रसायन अभियंता, असे बहुतेक लोक उच्चविद्याविभूषित आहेत. राजदीप सरदेसाईंना गालिब अब्दुल गुरूचे उत्तम मार्क ही गोष्ट "अ स्टोरी ऑफ होप" अर्थात "आशादायी गोष्ट" वाटते. त्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या मरहूम अब्बांना म्हणजे अफझल गुरूला किती मार्क होते माहित नाही, पण  एवढं निश्चित, की उत्तम गूण हे देशभक्त असल्याचं लक्षण ठरू शकत नाहीत. लक्षात घ्या, काहीही करा आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही (no matter what you do, we will not break) असं तो म्हणतो, डॉक्टर व्हायचं आहे असं तो म्हणतो, पण मला देशाचा चांगला नागरिक व्हायचं आहे असं काही त्याच्या तोंडून बाहेर पडलेलं नाही. तेव्हा हे बातमीविक्रेते किंवा माध्यमवेश्या काहीही म्हणोत सरकार आणि गुप्तहेर संस्थांनी त्याच्यावर लक्ष ठेवलेलंच बरं. अखंड सावधान असावे, असे श्री स्वामी समर्थ म्हणून गेलेच आहेत. तेव्हा आयसीसमधे सामील झालेल्या एका युवकाने धर्मबुडवी असल्याचा आळ घेऊन आपल्या मातेलाच गोळी घातल्याचे उदाहरण ताजे असताना आपल्या अतिरेकी असलेल्या बापाच्या फाशीचा सूड घ्यायला मातृभूमीला लक्ष्य करायचा हेतू तो बाळगत नाही ना, याची काळजी घेतली पाहीजे.  त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांचा किती फायदा होईल याबाबत साशंकताच आहे, पण शक्य झाल्यास त्याचं समुपदेशन करुन त्याला देशाचा जबाबदार नागरिक व्हायला मदत केली पाहीजे.

अब्दुल गुरूच्या परीक्षेतल्या उत्तम गुणांनी हुरळून गेलेल्या माध्यमवेश्यांचा मूर्खपणा इथेच थांबत नाही. २६/११चा हल्ला लाईव्ह दाखवल्याने व कदाचित मुद्दामून अनेक गोष्टी उघड केल्याने गमावलेले जीव स्मरणात आहेत ना? गालिब अब्दुल गुरूला खरोखरीच देशाचा चांगला नागरिक व्हायचं असेल, प्रामाणिक माणूस व्हायचं असेल, तर त्याच्या या दिशेने होणार्‍या संभाव्य प्रयत्नांना याच खोडसाळ आणि विघ्नसंतोषी बातमीविक्यांनी सुरुंग लावला आहे असे साधार म्हणण्यास वाव आहे. तो सापाचं पिल्लू ठरतो की हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेला भक्त प्रल्हाद, ते काळच ठरवील, मात्र त्याच्या बापाचं कर्तृत्व जगजाहीर असताना अशा प्रकारे त्याचं नाव माध्यमांत झळकावून त्याची ओळख उघड करुन किंवा अगोदरच माहित असल्यास ती आता अधिक व्यापक प्रमाणात पसरवून या बातमीविक्यांनी प्रचंड मोठी घोडचूक केली आहे हे नक्की. आता त्याची प्रत्येक हालचाल, तो कुठल्या महाविद्यालयात जाणार आहे, कुठल्या वर्गात बसणार आहे, त्याचे मित्र कोण याच्याकडेही लोकांचं लक्ष असणार.  उद्या त्याच्या जीवाला काही धोका झाला तर हेच बातमीविके उद्या मोदी सरकार आणि हिंदुत्ववाद्यांवर याचं खापर फोडायला मोकळे.

पण थांबा, तोच तर यांचा डाव कशावरुन नसेल?





--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ३, शके १९३७
--------------------------------------------------

Thursday, January 7, 2016

कोण तू? ते गळेपडू!

सद्ध्या एका विशिष्ठ प्रकारच्या लोकांशी सातत्याने संपर्क होतो आहे. त्या प्रकारच्या लोकांना कोठले विशेषण लावावे हा प्रश्न पडला आहे. संधीसाधू म्हणावे असे एक जण म्हणाला पण हा प्रकार जरासा वेगळा आहे.

सांगतो काय ते. व्यवसाय व नोकरी निमित्ताने कार्यालयात व बाहेर, शेजारीपाजारी, जवळचे व लांबचे नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, आणि इतर परिचित अशा असंख्य लोकांशी आपला संपर्क येत असतो. सोशल नेटवर्किंगवरही अनेकांशी ओळख होत असते.

यातले काही जण अनपेक्षितपणे खूप चांगले मित्र होतात, काहींचे संबंध कामापुरते मर्यादित राहतात, तर काहींशी जेमतेम ओळख राहते. काहींना चॅटिंग आवडत नाही, काहींना व्यक्तिगत फोनवरुन किंवा प्रत्यक्ष संपर्क आवडतो, तर काहींना फक्त ऑनलाईन गप्पा मारायच्या असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यातल्या अनेकांचे व्यवसाय असतात व त्याबद्दल ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून माहितीही देत असतात. अगदी अपरिचित व्यक्तींनीही त्यांच्या व्यवसायाबाबत संपर्क केल्यास माझा अजिबात आक्षेप नाही. माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, तुम्हाला रस असल्यास भेटूया ही सेल्स पीच साधी आणि सरळ आणि म्हणूनच माझी आवडती आहे.

पण काही जण असेही असतात की परिचय असूनही आंतरजालावर हाय केल्यावर प्रतिसाद देणार नाहीत, कार्यालयात समोर भेटल्यावर आपण बोलल्याशिवाय दिवसाच्या वेळेनुसार शुभेच्छांची देवाणघेवाण करणार नाहीत, रस्त्यात दिसल्यावर पुढे जाण्याआधी साधं ओळखीचं हसणार नाहीत, पण काम असेल तर मात्र अचानक सलगी करु लागतील.

कार्यालयात कलीग म्हणून काम करताना अनेकांशी आपला फारसा संपर्क येत नाही. नोकरी सोडल्यावर जो थोडाफार संभाषण असतं ते ही अनेकांच्या बाबतीत नाहीसं होतं. नोकरी सोडल्यावर अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांना आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणच्या सहकारी मंडळींची आठवण येते. अशा वेळी ज्यांच्याशी फारसं बोलणं होत नसेल, त्यांना सरळ माझं अमुक अमुक काम आहे, त्यासाठी तुमच्याशी बोलायचं आहे असं स्पष्ट सांगितलं तर बरं पडतं. आधी फेसबुकवर अनेक वर्षांच्या गॅपनंतर मित्रविनंती पाठवायची, हवापाण्याच्या गप्पा करायच्या, मग कुटुंबियांची चौकशी करायची, मग स्वत:च्या कुटुंबियांची माहिती द्यायची, मग हळूच फोन नंबर मागायचा, पहिल्यांदा फोन  केल्यावर कौटुंबिक आणि कार्यालयीन गप्पा मारायच्या, आणि मग लगेच काही दिवसांनी पुन्हा फोन केल्यावर "आय हॅव अ‍ॅन ऑस्सम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, तुला वेळ असेल तर बोलूया" असं म्हणायचं - या प्रकाराची मला प्रचंड चीड आहे. कामापुरता मामा करायची इच्छा असेल, तर स्पष्ट काम आहे असं सांगावं - मला पटलं तर मी त्यात भाग घेईन आणि आनंदाने मामा होईन, नाही पटलं तर स्पष्ट नाही म्हणून सांगेन. आधी अनेक वर्षांनंतर घनिष्ट मैत्री असल्याच्या थाटात कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं गळ्यात पडायचं आणि मग हळूच काम काढायचं या वृत्तीला कुठलं विशेषण लावावं या विचारात मी आहे.

ही वृत्ती असलेले लोक कार्यालयातच भेटतात असं नाही. लांबचा नातेवाईक आहे असं पाहून फेसबुकवर मित्रविनंती स्वीकारावी, तर आपण नंतर हाय केल्यावर वाचूनही त्या हायकडे दुर्लक्ष करण्यात येतं. संभाषणाचा प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडण्यात येतं. आणि मग काम असेल तेव्हा कित्येक वर्षांचा विरह झाल्यासारखं प्रेमाने गुड मॉर्निंग, कसे आहात होतं. बरं, यांच्या 'बिझनेस ऑपॉर्टुनिटीला' अप्रत्यक्ष भाषेत नकार द्यावा तर ते ही चालत नाही. तुम्ही 'बिझनेस ऑपॉर्ट्युनिटी' आधी ऐकून घ्या, मग बोला; तुमचा आणि वहिनींचा फोन नंबर द्या बरं" अशी वैतागवाणी प्रेमळ दटावणी ऐकून वैताग येतो.

अशा लोकांना एक तर स्पष्ट नकार देणे किंवा साफ दुर्लक्ष करणे या पैकी एक उपाय मी सहज यशस्वीपणे हाताळतो, मात्र अशा लोकांना नक्की काय विशेषण लावावं, या संभ्रमात मी आहे.

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १२, शके १९३७
--------------------------------------------------

Tuesday, January 5, 2016

तो वीर हुतात्मा झाला

हातात घेऊनी बाँब
तो वीर हुतात्मा झाला
वीरपत्नी आणि पोरे
अन् गाव पोरका झाला

सहकारी मित्र जन सारे
अन् हेलावला वारा
पण होता तो सर्वांचा
म्हणूनि देशही रडला सारा

पण किंमत या जीवाची
आम्हांसच होती खास
ज्या शत्रूशी झुंजला तो
त्या अवलादी नकोशाच

इच्छा तुला भरवायाची
आई म्हणाली याची
खाऊन घे मरण्याआधी
म्हणे थोर अम्मी 'त्याची'

थांबवा वृथा नरसंहार
आमच्या वीर पुत्रांचा
आता मारा बिळात घुसूनी
या दहशतवादी उंदरांना

लांबली कविता माझी
रात्रही झाली फार
झोपतो शांत चित्ताने
'तो' आहे सीमेवरती !

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ११, शके १९३७
--------------------------------------------------