Saturday, August 23, 2014

पोच

माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. नुकतेच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची एक जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्याने बाबांकडे गळ घातली आणि प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. या माणसाला आपली जागा द्यायची नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.
आमच्याच इमारतीतील एका कुटुंबासंबंधित किस्सा:
आमच्या इमारतीतील एक आजी कर्करोगाने आजारी आहेत. घरात त्यांचे पती, मुलगा, सून आणि दीड वर्षाची नात आहे. त्या आजींना भेटायला म्हणून काही लोक बाहेरगावाहून आले आणि मुक्कामाला चक्क त्यांच्याच घरी राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा, आंघोळीला पाणी काढून द्या, वर त्यांना मधुमेह असल्याने त्याची पथ्य सांभाळा हे त्या कुटुंबाने करत बसायचं का? लोकांना इतकी साधी अक्कल नसते?
सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्‍यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.
श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथी शेजारीण आईला म्हणाली. "तुमाला आता नौ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुमाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?" समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.
वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्‍याच दिवशी, "तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!" तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.
माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्‍या खवैय्यांची पंगत बसली." बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."
"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण". त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्‍याला पोहोचेपर्यंत थार्‍यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.
लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.

2 comments:

  1. माझी लग्न झालेली सख्खी बहिण अपघातात गेल्यानंतर काही महिन्यांनी एक जोडपं भेटायला आलं होतं. त्यांनी माझ्या आईला विचारलं होतं की या अपघातानंतर भरपाई म्हणून किती पैसे मिळाले? आणि त्याचं काय केलं? त्यावेळी मी तशी लहान असल्याने काही बोलू शकले नाही. याची मला मरेपर्यंत खंत राहील.

    ReplyDelete