Friday, December 23, 2011

चित्रपट परिचय - ५ | इनव्हिक्टस Invictus: खेळातून राष्ट्रीय एकात्मता - एक आगळावेगळा प्रयत्न

सत्तावीस वर्ष गोर्‍या लोकांनी तुरुंगात खितपत पडायला लावल्यावर - आणि त्यापैकी बहुतांश काळ सहा बाय पाच फुटांच्या एका खोलीत काढायला लागल्यावर - एका सामान्य कृष्णवर्णीय माणसाची सुटकेनंतर काय प्रतिक्रिया होईल? सुटल्यावर पहिली गोळी त्याने एका गोर्‍याला घालणे हीच. आणि समजा त्याच माणसाच्या ताब्यात देशाची धुरा सोपवली तर? कल्पना करवत नाही ना?

पण इथेच माणूस आणि देवमाणूस यातला फरक स्पष्ट होतो. ही गोष्ट आहे अर्थातच नेल्सन मंडेला यांची. इतकी वर्ष तुरुंगात खितपत पडल्यावरही 'सूड' ही भावना या महामानवाला शिवली देखील नाही. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्षपद हातात आल्यावर राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांमधे गोरे आणि काळे यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय एकात्मता कशी साधता येईल हेच प्रमुख उद्दिष्ट त्यांनी ठेवलं.

दोन देशांमधली दरी मिटवण्यासाठी क्रिकेटचा वापर म्हणजेच क्रिकेट डिप्लोमसी आपल्याला नवीन नाही. मंडेलांनी देशांतर्गत एकी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रग्बी या खेळाचा साधन म्हणून केलेला उपयोग मात्र नाविन्यपूर्ण म्हटला पाहीजे. इनव्हिक्टस हा अशाच धाडसी प्रयत्नांवर आधारलेला चित्रपट.


मंडेला यांची १९९० साली तुरुंगातून झालेली सुटका इथे हा चित्रपट सुरू होतो. मग झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात त्यांचा पक्ष विजयी झाल्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडही होते. वाढत चाललेली गुन्हेगारी आणि बेरोजगारी यांना रोखणे आणि आर्थिक डोलारा सावरणे या आणि अशा अनेक आव्हानांना ते भिडतात. राष्ट्रीय रग्बी संघाच्या म्हणजेच स्प्रिंगबॉक्सच्या एका सामन्याला ते हजेरी लावतात तेव्हा यच्चयावत कृष्णवर्णीय प्रेक्षक हे आपल्याच राष्ट्रीय संघाच्या विरोधात घोषणाबाजी करताना तर विरोधी संघाला पाठिंबा देताना त्यांना दिसतात. कारण काळ्यांच्या दृष्टीने स्प्रिंगबॉक्स म्हणजे अपार्थाइड या वर्णद्वेषी कायद्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ असतो. हे पाहिल्यावर कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्यातील दुरावा मिटवणं ही किती कर्मकठीण गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात येतं. पण "An optimist is a person who finds an opportunity in every calamity" हे वाक्य अंगी भिनवलेल्या मंडेला यांना या खेळातच एक आशेचा किरण दिसतो. जवळ जवळ वर्षभरातच दक्षिण आफ्रिका रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवणार असल्याने ही संधी साधून रग्बी हा खेळच राष्ट्रीय एकात्मता साधायला उपयुक्त ठरू शकेल अशी त्यांची मनोमन खात्री होते.



आधीच वर्णद्वेषी राजवटीचं प्रतीक म्हणून कृष्णवर्णिय जनतेत बदनाम असलेल्या स्प्रिंगबॉक्स संघाला त्याच्या वाईट कामगिरीचं कारण पुढे करुन सरळ बरखास्त करावं अशा निर्णयाप्रत कृष्णवर्णियांचं संख्याधिक्य असलेली दक्षिण आफ्रिकन क्रिडा समिती येते. पण निराळाच विचार आणि एक निश्चित ध्येय मनात असलेल्या मंडेलांच्या हस्तक्षेपामुळे स्प्रिंगबॉक्स संघाला आणखी संधी द्यावी या त्यांच्या विनंतीला समिती तयार होते. आणि मग सुरू होतो एक जबरदस्त प्रवास.

स्प्रिंगबॉक्स संघाने विश्वचषक जिंकल्यास ते राष्ट्रीय ऐक साधण्याच्या दृष्टीने एक मोठे यश ठरू शकेल असा विश्वास मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचा कप्तान François Pienaar (मॅट डेमन) याच्याकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतात. तुरुंगात असताना त्यांना स्फूर्तीदायक ठरलेली Invictus ही कविता ते François ला ऐकवतात.



हा अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात आणायचा असेल तर कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे जाणून François आणि त्याचे संघ ढोर मेहनतीला सज्ज होऊन प्रशिक्षण आणि सरावाला सुरवात करतात. एकदा तर मंडेला स्प्रिंगबॉक्स संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून सरावाच्या ठिकाणी अचानक भेट देतात. मंडेलांच्या कल्पनेशी संघनायक François सहमत असला तरी वांशिक संघर्ष, रक्तपात, आणि परस्पर द्वेष यांनी अनेक तपं देशात आंतरिक कलह माजवलेला असताना रग्बी हा खेळ देशात काळ्या-गोर्‍यांची कशी काय एकी घडवून आणणार अशी शंका अनेक दक्षिण आफ्रिकी नागरिकांना असते.


मंडेलांच्या सूचनेनुसारच संघातले खेळाडू फक्त बंदिस्त सरावात आनंद न मानता सामान्य नागरिकांत - मुख्यत्वेकरून कॄष्ण्वर्णीय नागरिकात मिसळणे - हा सरावाचा एक भागच बनवून टाकतात. चित्रपटातला हा भाग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. खेळाडू रस्त्यावर, मैदानात गरीब वस्तीतल्या कॄष्ण्वर्णीय लहान मुलांबरोबर खेळतात तेव्हा त्या लहानग्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हे काही सांगून जातो, ते शब्दांत माडणं निव्वळ अशक्य आहे. यासाठी हा चित्रपटच बघायला हवा.

सरावाचा भाग म्हणून लोकांत मिसळल्याने जनतेत एक सुंदर सकारात्मक संदेश जातो आणि अधिकाधिक कॄष्ण्वर्णीय नागरिक स्प्रिंगबॉक्सला पाठिंबा देऊ लागतात. पहिल्या सामन्यात स्थानिक जनतेचा फारसा पाठिंबा मिळवू न शकलेला हा संघ मात्र दुसर्‍या आणि पुढच्या सामन्यांत मात्र सर्व जमातींचे प्रेक्षक बघून हरखून जातो. अर्थात साक्षात राष्ट्राध्यक्ष मंडेला यांचा वरदहस्त या मोहिमेला असल्याने जनता अधिकच विश्वासाने आणि आत्मीयतेने स्प्रिंगबॉक्सकडे पाहू लागते. मंडेलांचा सशक्त पाठिंबा, नियोजनबद्ध सराव, जनतेच्या सर्व थरातून मिळणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा पाठिंबा यांनी संघाची कामगिरी सातत्याने सुधारत जाते आणि विजेतेपद तर सोडाच, पण हा संघ फारफार तर उप-उपांत्य फेरी गाठेल हा तज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरवत स्प्रिंगबॉक्सचा संघ न्युझिलंड ऑल ब्लॅक्स या जगातल्या सर्वोत्तम संघाविरुद्ध अंतीम सामना खेळायला सज्ज होतो. अंतीम सामन्यात राष्ट्राध्यक्ष मंडेला हे स्प्रिंगबॉक्स संघाचा शर्ट घालून मैदानात दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी अवतारतात.


मग पुढे काय होतं? François Pienaar च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा स्प्रिंगबॉक्स संघ अंतीम सामना जिंकतो का? मंडेलांचं स्वप्न पूर्ण होतं का? हे सगळं बघायला मात्र चित्रपट प्रत्यक्षच बघा.

मला वाटलेला चित्रपटाचा सगळ्यात जमेचा भाग म्हणजे इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखं (उदा. गांधी) कुठेही चरित्रनायकाचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं नाही, त्याला देवत्व वगैरे बहाल केलेलं नाही. गोरे आणि काळे यांची एकी घडवून आणण्यामागे मंडेला यांची फक्त आणि फक्त मानवतावादी वृत्ती आहे असं न दाखवता त्यामागचा त्यांचा वास्तववादी दृष्टीकोन आणि राजकीय दूरदृष्टीही चित्रपटात दाखवली आहे. प्रशासकीय व्यवस्थेतले महत्वाचे घटक असलेले नोकरशहा आणि संरक्षण ज्यांच्या हातात ते सैन्य आणि पोलीस यांत असलेल्या गौरवर्णीयांचं अनुभव (आणि संख्याधिक्य सुद्धा) लक्षात घेऊन अतिशय कौशल्याने त्यांचे हितसंबंध जपत, कुणालाही फारसं न दुखावता कृष्ण्वर्णीयांनाही या विभागात योग्य संधी कशा मिळतील याची काळजी मंडेलांनी घेतली त्याचीही छोटीशी झलक आपल्याला बघायला मिळते.

मंडेला यांच्या अंगरक्षकांमधे असलेले गोरे आणि काळे सदस्य यांच्यातली धुसफुस दाखवणारं दॄश्य इथे ठळकपणे आठवतं. एकाच वेळी गंभीर आणि गंमतीदार वाटणारं दृश्य लक्ष देऊन बघण्यासारखं आहे. तसंच आणखी एक दृश्य - आपल्याला गोर्‍यांसोबत काम करावं लागणार हे समजताच अंगाचा तीळपापड झालेल्या काळा अंगरक्षक जेसन राष्ट्राध्यक्ष मंडेलांच्या ऑफिसात आपलं गार्‍हाणं घेऊन जातो. याच गोर्‍यांनी कदाचित आपल्यावर गोळ्या झाडल्या असतील मागे अस उद्विग्नपणे म्हणणार्‍या जेसनला समजावताना मंडेला म्हणतात "Reconciliation starts here.........." हे वाक्य त्यांच्यातला नेता जागा असल्याचं दाखवतं तर "Forgiveness starts here too. Forgiveness libarates the soul. It removes fear. That is why it is such a powerful weapon.", या वाक्यातून त्यांच्यातला महामानव बोलतो.

पात्रनिवडीसाठी संबंधितांचं खास अभिनंदन केलंच पाहिजे. नेल्सन मंडेला यांच्या भूमिकेसाठी मॉर्गन फ्रीमन या जेष्ठ आणि गुणी चरित्र अभिनेत्याची इतर कुठल्याही पर्यायांचा विचार न करता झालेली निवड हा एक अचूक ठरलेला निर्णय. मॉर्गन फ्रीमन यांनी नेल्सन मंडेला यांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच अभ्यास केलेला स्पष्ट दिसतो. संपूर्ण चित्रपट बघताना कुठेही आपण मॉर्गन फ्रीमन या स्टारला बघत नसून साक्षात मंडेलाच पडद्यावर वावरत आहेत असं वाटत राहतं इतका अप्रतीम मुद्राभिनय आणि मंडेला यांच्या देहबोलीची आणि उच्चारांची उत्कृष्ठ नक्कल फ्रीमन यांनी केली आहे. मंडेला यांना बोलताना ज्यांनी टीव्हीवर ऐकलं असेल त्यांना फ्रीमन यांचं कौतुक करण्यावाचून पर्याय राहणार नाही. बॉर्न आयडेंटिटी आणि त्याचे सिक्वेल, ऑशन्'स चित्रपट मालिका, सिरिआना, द डिपार्टेड आणि अशा अनेक यशस्वी चित्रपटातून आपला चतुरस्त्र अभिनय सादर करणारा मॅट डेमन याने आपल्या नेहमीच्या डॅशिंग अ‍ॅक्शन हीरोचं बेअरिंग थोडं बाजूला ठेऊन संयत अभिनयाचं सुंदर दर्शन घडवलं आहे. बॉलिवुडशी तूलना करायची तर अशा प्रकारच्या भूमिका आपल्याकडे जॅकी श्रॉफच्या वाट्याला यायच्या.

पण आधी एक इशारा देऊ इच्छितो. दिग्दर्शक म्हणून क्लिंट इस्टवूड हे नाव आणि कलाकारात मॉर्गन फ्रीमन आणि मॅट डेमन ही नावं वाचून हा सिनेमा बघायला जाणार असाल तर पुन्हा विचार करा. कारण या दोघांच्या सशक्त अभिनयाने नटलेला या चित्रपट मात्र थरारक, वेगवान, किंवा अंगावर काटा आणणारा वगैरे अजिबात नाही. अनेक ठिकाणी बर्‍यापैकी संथ तर काही ठिकाणी तर हा चक्क डॉक्युमेंटरी चालली आहे की काय असं वाटण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना हा चित्रपट चक्क कंटाळवाणाही वाटू शकतो. सुरवातीला काही दृश्यांमधे संवादही कृत्रिम आणि पाठांतर करुन म्हटल्यासारखे - म्हणजेच सहजतेनं न येता नाटकी वाटतात. पण कथेच्या आत्म्याशी मात्र चित्रपट संपूर्ण प्रामाणिक राहतो. शिवाय नेल्सन मंडेलांच नामक जादुगार मॉर्गन यांनी इतक्या जबरदस्तपणे उभा केला आहे की चित्रपटातल्या बाकी तृटींकडे लक्षच जात नाही.

मंडेला यांच्या बरोबर उलट मार्गाक्रमण केलेल्या शेजारच्या झिंबाब्वेतल्या रॉबर्ट मुगाबे यांच्या नेतृत्वाखाली आज झिंबाब्वेची आज अराजक, हिंसा, आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे चालेलेली ससेहोपलट आपण बघतोच आहोत. मंडेला यांनी स्प्रिंगबॉक्स रग्बी संघात गोर्‍यांच संख्याधिक्य असूनही हा संघ जास्तीत जास्त ताकदवान आणि यशस्वी कसा होईल याकडे लक्ष दिलं, तर मुगाबे यांच्या द्वेष आणि सूडानेच भरलेल्या राजवटीने देशाच्या सर्वच क्षेत्रात बजबजपुरी ही माजवलीच पण कमकुवत असलेला - म्हणजे 'झिंबाब्वे उभा राहिला, आम्ही नाही पाहिला' - असा झिंबाब्वेचा क्रिकेट संघ फ्लॉवर बंधू, अ‍ॅन्डी ब्लिगनॉट, मरे गुडविन, पॉल स्ट्राँग, नील जॉनसन, एड्डो ब्रँडिस यांच्यासारख्या अनेक गुणी खेळाडूंमुळे हळूहळू प्रगती करत सामने आणि मालिका जिंकायला सुरवात करत असतानाच त्यांना त्यांच्या गौरवर्णामुळे (रिव्हर्स रेसिझम/डिस्क्रिमिनेशन?) संघाबाहेरच नव्हे तर देशाबाहेरही पडायला भाग पाडून झिंबाब्वेतल्या क्रिडा क्षेत्राचीही ससेहोलपट केली. १९९५ साली रग्बी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलेल्या दक्षिण आफ्रिकेने त्या पाठोपाठ २००३ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१० सालचा फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपदही भूषवलं आणि खेळजगतावर आपला ठसा उमटवला.

चित्रपटातील एका दृश्यात मंडेला यांच्या सुटकेनंतर त्यांच्या मोटारींचा ताफा एका रग्बी मैदानावरुन जात असताना एक शा़ळकरी मुलगा शाळेच्या रग्बी प्रशिक्षकाला विचारतो, "हे कोण आहे सर?" त्याला उत्तर मिळतं, "It's the terrorist Mandela, they let him out. Remember this day boys, this is the day our country went to the dogs."

या पार्श्वभूमीवर मुगाबेंच्या सारखं वागणं मंडेला यांना अशक्य होतं का? नक्कीच नाही. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे इतकी वर्ष ज्यांच्यामुळे तुरुंगात सडावं लागलं, तर बाहेर पडल्यावर पहिली गोळी त्यातल्याच एका गोर्‍यालाच घालावीशी वाटली असती. पण हाडाचे लोकशाहीवादी असलेल्या नेल्सन मंडला यांच्या मनाला सूड, प्रतिशोध वगैरे तर नाहीच, पण गोर्‍यांप्रती द्वेषभावनाही शिवली नाही. दक्षिण आफ्रिकेत अनेक शतकं गोर्‍यांचे अत्याचार सहन केल्यानंतर काळ्यांची मानसिकता काय असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. तसंच 'आता काळ्यांच्या हातात राज्य गेलं - मग आपलं भवितव्य काय' ही चिंता गोर्‍यांनाही सतावणं साहजिकच. पण याही परिस्थितीतून मार्ग काढून मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला स्थैर्य मिळवून देण्याच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली. अनेक जाती-जमातींमधे विभागले गेलेले आणि गुलामी आणि भेदभाव यांच्याखाली पिचलेले कृष्ण्वर्णीय आणि वर्षानुवर्ष फक्त राज्यकर्त्याची भूमिका करण्याची सवय झालेले गौरवर्णीय यांच्यात परस्पर सहकार्यच नव्हे तर सौहार्द निर्माण करण्याची किमया त्यांनी करुन दाखवली. काळ्यांची प्रगती व्हावी आणि गोर्‍यांना हा देश त्यांचाच वाटत रहावा ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यात आज जर दक्षिण आफ्रिका बर्‍याच अंशी यशस्वी झाला असेल तर तो निव्वळ नेल्सन मंडेला आणि त्यांच्या समविचारी सहकार्‍यांमुळेच.

चित्रपटातील एका दृश्यात एक सुंदर संवाद आहे. François Pienaar आणि त्याचा संघ मंडेला यांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं त्या तुरुंगाला भेट देतात. ते ठिकाण बघून एका संघसहकार्‍याशी बोलताना François म्हणतो ".......I was thinking about how you spend 30 years in a tiny cell, and come out ready to forgive the people who put you there." हे वाक्य ऐकल्यावर मंडेला नामक महामानवाला मनोमन वंदन केल्यावाचून राहवत नाही.

कधी कधी वाटतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच आपल्याकडे नेल्सन मंडेला यांच्याइतकी दूरदृष्टी असलेला, समाजाभिमुख राजकारण करणारा आणि अर्थातच त्यांच्या इतका करिश्मा असलेला नेता आपल्या देशाला मिळाला असता तर....... तर कदाचित आज जी जातीय राजकारणाची बजबजपुरी माजली आहे ती माजली नसती. सार्‍या जर आणि तर च्या गोष्टी. दुर्दैवाने हल्ली समाजोपयोगी कामे किती यापेक्षा उपद्रवमूल्य किती हे बघितले जाते. भविष्यात असा नेता कदाचित निर्माण झालाच तर त्याच्यावर असा चित्रपट आपल्याकडे निर्माण होईलही. पण तो पर्यंत आपण इन्व्हिक्टस सारख्या चित्रपटांचा आस्वाद जरूर घेऊ शकतो.  

हा लेख वाचून चित्रपट बघावासा वाटल्यास आणि बघून चित्रपट आवडल्यास जरूर कळवा.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

Thursday, October 27, 2011

चैतन्यमूर्ती शम्मी कपूर

एका रविवारची सुस्त सकाळ. अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळ बघितलं तर सात वाजलेले. "रंगोली लागलं असणार" असं म्हणून रिमोटकडे हात गेला. आणि पहिल्याच गाण्याने रविवारी सकाळी सात वाजता जो काही आळस अंगात भरलेला असतो तो पार कुठच्याकुठे पळाला. मी ताडकन उठून उभा राहिलो. "ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा...." म्हणत काश्मीरच्या दाल लेकमधे शिकार्‍यात शम्मी कपूर शर्मिला टागोरला पटवण्यासाठी बेभान होऊन नाचत होता. आमच्या पिढीतल्या कित्येकांना याच गाण्याने शम्मीचा परिचय करून दिला होता. काही माणसात अजब जादू असते. आपल्या नुसत्या असण्याने ते आसपासच्या सगळ्या मनुष्यमात्रात चैतन्य आणतात. शम्मी कपूर त्यातलाच. घरी कुणी नव्हतं हे माझ्या पथ्यावरच पडलं. सगळ्या खिडक्यांचे पडदे लावून शम्मीच्या नाचावर घरातल्या घरात त्याच्या उत्स्फूर्तपणा आणि बेभानपणाला गाठण्याची पराकाष्ठा करत नाचायला सुरुवात केली.

शेवटी एकदाचा तो बोटीतून धप्पकन पाण्यात पडला, गाणं संपलं, जाहिरात लागली आणि मी भानावर आलो. अचानक एक पोकळी निर्माण झाल्याचं वाटू लागलं. पण तो रविवार त्या काही मिनिटातच साजरा झाला होता.



शमशेरराज कपूर असं भारदस्त नाव घेऊन मुंबईत जन्मलेल्या शम्मी कपूरच्या बालपणीची सुरुवातीची वर्ष कलकत्त्यात गेली. वडील पृथ्वीराज कपूर कलकत्त्याच्या न्यू थिएटर्समध्ये अभिनेता म्हणून काम करायचे. सुरुवातीची काही वर्ष तिथे शिक्षण घेतल्यावर मुंबईत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमधे तो मात्र फार काळ रमला नाही. लवकरच त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये उमेदवारीला सुरुवात केली.

काही काळ तिथे घालवल्यावर १९५३ साली त्याने जीवन ज्योत या चित्रपटाद्वारे नायक म्हणून पडद्यावर पदार्पण केलं. मनमोहक निळे डोळे, अत्यंत देखणा चेहरा, तलवारकट मिशा आणि एकंदरीत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या शम्मीला सुरूवातीला मात्र यशाने सतत हुलकावणी दिली. त्या काळी प्रस्थापित असलेल्या स्टार्स मधुबाला, नलिनी जयवंत, नूतन यांच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर अनेक चित्रपट करूनही शम्मीच्या पदरात सतत अपयशाचं दान पडत गेलं. मोठा भाऊ राज कपूरच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्त्व ही त्याच्या विरोधात जाणारी एक महत्त्वाची गोष्ट. त्या मिशांमुळे म्हणा किंवा सारख्या केशरचनेमुळे म्हणा, तो तसा दिसायचाही. त्याच्यावर राजची नक्कल केल्याचा सुरूवातीला आरोप केला जायचा.

   
यशाच्या प्रतिक्षेत असलेल्या शम्मीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना घडली. त्या काळात यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अत्यंत गोड चेहर्‍याच्या गीता बाली बरोबर रंगीन रातें (१९५६) हा चित्रपट करत असताना साहेब तिच्या प्रेमात पडले. "माझ्याशी लग्न कर!" म्हणून अनेक आर्जवं केल्यानंतर अचानक एके दिवशी गीताने "लग्न करते तुझ्याशी, पण आजच्या आज करत असलास तर!" अशी विचित्र अट घातली. मग काय, एका पायावर तयार झालेल्या शम्मीने लगेच तयारी दाखवली आणि दोघे मुंबईतील बाणगंगा परिसरातल्या एका देवळात विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे तेव्हा शम्मी हा चित्रपटसृष्टीत कुणीही नव्हता आणि गीता लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आधीच प्रस्थापित झाली होती. शम्मीच्या आयुष्यात एका भक्कम आधाराने आता प्रवेश केला होता.

शम्मीने त्याच्या तलवारकट मिशांना सोडचिठ्ठी दिल्यावर त्याचं नशीब फळफळलं. मग आला तो फिल्मिस्तान स्टुडिओजच्या नासिर हुसैनने काढलेला तुमसा नहीं देखा (१९५७). तोपर्यंत अपयशाला कंटाळलेल्या आणि हा चित्रपट न चालल्यास चित्रपटसृष्टीलाच रामराम ठोकण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या शम्मी कपूरला या सिनेमाने चांगलाच हात दिला. तिकीटबारीवर घवघवीत यश तर या चित्रपटाने मिळवलंच, शिवाय शम्मीला रातोरात तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणून स्थानही मिळवून दिलं. चॉकलेटी अभिनय करणारा देव आनंद, तुपकट चेहर्‍याचा राज कपूर आणि 'करुण' कुमार दिलीप कुमार यांनी आपल्याभोवती बांधलेल्या चाहत्यांच्या आवडीनिवडीच्या अभेद्य भासणार्‍या कवचाला शम्मीने अखेर भेदलं होतं. मूर्तीमंत चैतन्य असलेल्या शम्मीच्या रूपात तरुण वर्गाला या सिनेमाने एक नवा 'युथ आयकॉन' मिळवून दिला. एका आख्ख्या पिढीला वेड लावलं, बेभान केलं.

तुमसा नहीं देखा नंतर दोन वर्षांनी आलेल्या दिल देके देखो (१९५९) या चित्रपटामुळे उंच, गोर्‍यागोमट्या, खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या शम्मी कपूरचं धडाकेबाज नायक म्हणून तरुणांच्या हृदयातलं स्थान आणखी पक्कं झालं. हे दोन चित्रपट केवळ शम्मीसाठीच नव्हे तर अनुक्रमे अमिता व आशा पारेख या दोन नवोदित अभिनेत्रींसाठीही परीसस्पर्श ठरले. दोघी पुढे नामवंत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेल्या. यानंतर नवोदित अभिनेत्रींना शम्मी कपूरबरोबर संधी देण्याची निर्मात्यांमध्ये स्पर्धाच लागली.

उपरोल्लेखित दोन चित्रपटांनी शम्मी कपूरच्या एक धडाकेबाज आणि बिंधास नायक म्हणून प्रस्थापित केलेल्या प्रतिमेवर त्यानंतर आलेल्या जंगलीने (१९६१) शिक्कामोर्तब केलं. 'जंगली' तून सायरा बानोने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटातलं (अर्थातच रफीच्या आवाजातलं) याssssssहू हे गाणं त्या वेळीच काय तर आजही तितकंच लोकप्रिय आहे.

यानंतर शम्मीने जंगली, दिल तेरा दीवाना, प्रोफेसर, चायना टाऊन, ब्लफ मास्टर, राजकुमार, कश्मीर की कली, आणि जानवर अशा यशस्वी चित्रपटांची रांगच लावली. शम्मीच्या चित्रपटांचं एक अविभाज्य अंग (म्हणजे काश्मीर हे भारताचं अविभाज्य वगैरे अंग आहे त्यापेक्षा जास्तच अविभाज्य) म्हणजे रफीच्या स्वर्गीय आवाजात गायलेली कर्णमधुर गाणी. तुमसा नहीं देखा मधलं "यूं तो हमने लाख हसीं देखें है, तुमसा नहीं देखा" आणि दिल देके देखो मधलं "दिल देके देखो, दिल देके देखो, दिल देके देखो जी, दिल लेने वालों दिल देना सीखो जी" या चित्रपटांपासून सुरू झाला तो रफी आणि शम्मीचा चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असा सुरेल आणि देखणा प्रवास. मुळातच संगीताची उत्कृष्ट जाण असलेल्या शम्मी कपूरने प्रत्येक गाण्यातली प्रत्येक फ्रेम आपल्या चैतन्यपूर्ण देहबोलीने आणि नितांतसुंदर अभिनयाने पडद्यावर प्रेक्षणीय केली, तर स्वर्गीय गळ्याच्या रफीने प्रत्येक गाणं श्रवणीय करून सोडलं. शम्मीच्या अभिनयाला साजेसा आवाज देण्याकडे रफीचा नेहमीच कटाक्ष असे. शम्मी स्वतःच्या प्रत्येक गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी जातीने हजर असे. शम्मी कपूरने अनेकदा "रफी साहेबांशिवाय मी कुणीच नव्हतो!" हे जाहीररीत्या कबूल केलं आहे. जेव्हा रफीचं निधन झालं तेव्हा ती बातमी त्यांना "शम्मीजी, तुमचा आवाज गेला!" अशी सांगण्यात आली.

अर्थात यामुळे धम्माल आणि धागडधिंगा असलेला नाच एवढीच शम्मीच्या गाण्यांची ओळख आहे असा समज मात्र कुणी करून घेऊ नये. सुंदर मुद्राभिनयातही तितकंच प्राविण्य मिळवलेल्या शम्मीने हळुवार रोमँटिक गाण्यांनाही तितकंच प्रेक्षणीय केलं. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ, एहसान तेरा होगा मुझपर, ए गुलबदन, है दुनिया उसीकी जमाना उसीका, हम और तुम और ये समां, तुमने किसी की जान को जाते हुए देखा है, इशारों इशारों मे दिल लेने वाले, रात के हमसफर थक के घर को चले, मै जागू तुम सो जाओ ही व अशी अनेक गाणी आठवून बघा. शम्मी कपूर हा अष्टपैलू अभिनेता असल्याची तुमची नक्की खात्री पटेल.

देव आनंदला नाचता येत नसेच. पण राज आणि दिलीप या दोघांनी नाचण्याचा फारसा प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाही. तेव्हा चित्रपटांत कथेच्या नावाखाली काहीही चालून जात असलं तरी प्रेक्षक मोर आणि माकड यांमध्ये नक्कीच फरक करू शकत असले पाहिजेत, कारण पुढे एक गृहस्थ जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्धीस आले तरी त्यांना कुणी छान 'नाचतो' असं म्हणायला धजावलं नाही. शम्मीने मात्र उत्तम नाचणारा नायक म्हणून अनेक वर्ष सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याला नाचता येत नसे असे तो म्हणे. विश्वास बसतो? गाण्यात नाचणं कुठे आवश्यक आहे, कुठे लयबद्ध पदलालित्य अपेक्षित आहे हे अचूक ओळखून तो स्वतःच कसं नाचायचं ते ठरवी. शम्मीला संगीताची आणि ठेक्याची इतकी चांगली जाण होती की त्याच्या गाण्यांसाठी त्याला कधीही नृत्यदिग्दर्शकाची गरज पडलीच नाही. एक काळ असा होता की गाण्यावर शम्मी नाचतोय की त्याच्या नाचामुळे गाणं बहरतंय असा प्रश्न पडावा. 'गोविंदा आला रे आला' हे गाणं आठवा, आजही हे गाणं लागलं की कृष्णभक्ती आणि कान्हाचा नटखटपणा याचं मिश्रण चेहर्‍यावर बाळगत रस्त्यावर बेभान होऊन नाचणारा शम्मीच डोळ्यांसमोर येतो.


जणू शम्मीच गातोय असं वाटावं इतका फिट बसणारा रफीसाहेबांचा आवाज आणि उत्स्फूर्ततेचं उत्तम उदाहरण असलेला शम्मीचा अप्रतिम नाच या गोष्टींमुळे शम्मी 'भारताचा एल्विस प्रिस्ली' म्हणून ओळखला जाऊ लागला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९६६ साली आलेला गोल्डीचा तीसरी मंझिल हा चित्रपट. प्रचंड लोकप्रिय झालेला हा रहस्यपट मात्र अत्यंत नाट्यमय रीतीने शम्मीच्या पदरात पडला. एका पार्टीत निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता) आणि शम्मी कपूरचा नायक म्हणून चित्रपटात प्रवेश झाला. दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. 'ओ हसीना जुल्फों वाली' या गाण्यात नृत्यनिपुण हेलनच्या प्रत्येक अदा आणि पदलालित्याला तोडीस तोड नाच शम्मीने करून दाखवला आहे. या चित्रपटातलं एक दृश्य शम्मी त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर ('पीक') असल्याची जाणीव करून देतं. प्रेमनाथने एका खोलीत पाठवल्यावर कपाट उघडून त्यातला एक वेश तो परिधान करतो. त्याच वेळी त्याची बटणं बघून त्याला अचानक खुनी कोण ते ध्यानात येतं, तेंव्हा त्याचे विस्फारलेले डोळे आणि अप्रतिम मुद्राभिनय आपल्याला जिंकून जातो.

तीसरी मंझिलचं चित्रीकरण सुरू असतानाच गीता बाली देवीच्या आजाराला बळी पडून हे जग सोडून गेली. या घटनेने शम्मीला बसलेला धक्का इतका मोठा होता की जवळजवळ तीन महिने तो चित्रीकरणात सहभागी होऊ शकला नाही. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण केला. नायक म्हणून कारकिर्दीसाठी शम्मीच्या आयुष्यात गीताचा प्रवेश जसा शुभशकुन ठरला, तसाच गीताचा मृत्यू हा अपशकुन. याच चित्रपटानंतर शम्मी्चा कारकिर्दीतला दुसरा टप्पा सुरू झाला. अनेक चित्रपटांमधून झालेल्या अनेक छोट्यामोठ्या अपघातांमुळे झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या नाचण्यावर बंधनं आली आणि त्याची कारकिर्द नायक म्हणून हळूहळू उतरणीला लागायला सुरुवात झाली.

अर्थात या कालावधीतही शम्मीने अनेक सुंदर आणि लोकप्रिय कलाकृतींचा आनंद सिनेरसिकांना दिला. बदतमीज, लाट साहब, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस, प्रिन्स यासारखे सिनेमे हे याहू पठडीतल्या शम्मी कपूरची आठवण करून देत राहिले, तर ब्रह्मचारी आणि अंदाज या चित्रपटातून त्याच्या प्रगल्भ आणि संयत अभिनयाचं दर्शन घडलं. यांपैकी 'ब्रह्मचारी' ने त्याला त्याच्या कारकिर्दीतलं एकमेव फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ठ अभिनेता हे पारितोषिक मिळवून दिलं. याच सिनेमातील 'मैं जागू तुम सो जाओ' या गाण्यात शम्मीच्या चेहर्‍यावर मूर्तीमंत वात्सल्य झळकताना आपल्याला दिसतं.

शम्मीच्या चरित्र भूमिकांची खर्‍या अर्थाने सुरुवात झमीर या चित्रपटापासून झाली आणि या अष्टपैलू अभिनेत्याने कारकिर्दीतला हा टप्पाही यशस्वीपणे पेलला. इंग्रजी चित्रपट इर्मा ला दूस (Irma La Douce) ची नक्कल असलेला मनोरंजन या चित्रपटात अभिनयाबरोबाच दिग्दर्शनही करुन त्याने एका वेगळ्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यानंतर आलेल्या बंडलबाज या चित्रपटापर्यंतच टिकला. विधाता चित्रपटातल्या भूमिकेने त्याला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलं. मग परवरिश, मीरा, रॉकी, नसीब, हीरो, बेताब, इजाजत अशा चित्रपटांद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकत राहिला. शेवटी नव्वदच्या दशकात त्याने चित्रपटामधे भूमिका करणं कमी कमी करत शांत जीवन जगणं पसंत केलं.

पण शांत बसेल तर तो शम्मी कसला? कंप्यूटर सॅव्ही असलेला शम्मी भारतात इंटरनेटच्या पहिल्या वापरकर्त्यांपैकी एक होता. इतकंच नव्हे तर आंतरजाल वापरणार्‍यांची संघटना 'इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडिया' (ICUI) चा तो संस्थापक अध्यक्षही होता. त्याच्याच म्हणण्यानुसार "भारतात इंटरनेट येण्याआधीपासून मी इंटरनेट वापरतोय!". गंमत म्हणजे शेवटपर्यंत विंडोज आणि मायक्रोसॉफ्टच्या आहारी न जाता निष्ठेने अ‍ॅपल मॅक वापरलं. शम्मी त्याच्या भरभराटीच्या काळात जसा शांत आणि समजूतदार होता, तसाच तो निवृत्तीनंतरही तितकाच प्रेमळ आणि दानशूर राहिला. अनेक वर्षांपूर्वी 'जयबाला आशर' नामक एका तरुणीवर रेल्वेगाडीत एका व्यसनाधीन तरुणाने हल्ला करुन चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले होते आणि या घटनेत तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. शम्मीने त्या तरुणीस बर्‍याचदा भेट देऊन तिचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि ती इस्पितळातून घरी गेल्यावर तिला एक नवा कोरा संगणक भेट म्हणून दिला.

किडनीच्या विकाराने ग्रासलेल्या शम्मीला डायलिसिस सारख्या त्रासदायक प्रक्रियेसाठी आठवड्यातून तीनदा इस्पितळात यावं लागे. अशावेळी स्वभावात कडवटपणा, किरकिरेपणा शिरण्याची शक्यता असते. पण "The difficulties of life are intended to make us better, not bitter" ह्या पंक्ती अक्षरशः जगलेल्या शम्मीचा एकंदर जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कधी बदलला नाही. शेवटपर्यंत त्याची 'देवाने मला आयुष्यात भरभरून दिलं आहे आणि माझी कशाबद्दलही काहीच तक्रार नाही' हीच वृत्ती कायम राहिली. ह्या त्याच्या प्रवासात त्याला खंबीर साथ होती ती त्याची द्वितीय पत्नी नीलाची.

याच आजाराशी लढता लढता अखेर शम्मी कपूरने १४ ऑगस्ट २०११ च्या पहाटे इहलोकीची यात्रा संपवली. त्याच्या अंत्यसंस्कारांना त्याचा धाकटा भाऊ शशी कपूर व्हीलचेअरवर हजर होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जणू म्हणत होते, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे."

मला खात्री आहे. शम्मी कपूरचा आत्मा न्यायला यम स्वतः आला असणार. इतकंच नव्हे तर त्याच्यासारख्या राजकुमाराला न्यायला स्वर्गातून एक स्पेशल हत्तीही सोबत आणला असणार. त्याच्या पृथ्वीतलावरच्या वास्तव्याची स्तुती करत कुणीतरी गाणंही म्हणत गेलं असेल "आगे पीछे तुम्हारी सरकार, तुम थे यहाँ के राजकुमार".
 


© मंदार दिलीप जोशी

Sunday, October 23, 2011

निर्माल्य

आज माझ्या डायरीत
केविलवाणं झालेलं
एक गुलाबाचं फूल सापडलं..
तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं
आता बरचसं हिरमुसलेलं

डायरीच्या
त्याच दोन पानांवर दिसले
आठवणींच्या शिंतोड्यांसारखे
उमटलेले गुलाबी ठिपके

खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या
नेहमीच्याच गुलमोहराने
रात्री सावल्यांचे भेसूर आकार
नाचवावेत तसे...

आपल्या आठवणींच्या जणू
तशाच सावल्या झाल्या आहेत
आणि नातंही
त्या गुलाबासारखं....

वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी
निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं,
कालच्या पूजेची
अस्पष्ट आठवण करुन देणारं!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
'मोगरा फुलला दिवाळी अंक २०११' इथे पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Wednesday, October 19, 2011

अस्तित्व

आज रात्री जेव्हा
तू चंद्र बघशील ना रे
तेव्हा माझी आठवण काढ...
तो सुंदर दिसतो म्हणून नव्हे रे!
तर अशासाठी,
की जसा असंख्य तार्‍यांच्या
संगतीत असूनही तो एकलाच
तशीच सार्‍यांत असलेली
मी ही...

तुझ्याच अमर्याद मनोधैर्याच्या साथीने
जगते आहे रे
माझ्या अस्तित्वाची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त....

तुझीच प्रभा
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच रवीकिरणं झेलून
परावर्तित करणार्‍या
त्या चंद्रासारखीच

तरीही...
हा एकलेपणा संपवण्याची
भलती स्वप्नं
नको रे दाखवूस
आपल्यातलं अंतरच करेल
माझी राखण!

पण...
काहीही झालं तरी
माझं अस्तित्वच
तुझ्या 'असण्यावर' अवलंबून!!

Tuesday, October 11, 2011

धडा

जरा काही खुट्टं झाल्यावर
राईचा पर्वत करण्याचा
स्वभावच त्याचा...

मग आज काय?
तर म्हणे कालच आणलेले
नवीन बूट अचानक आवडेनासे!
मग ते बदलायला...
तणतणतच गेला दुकानात

गल्ल्यावर बसलेल्या तिने
हसत चौकशी केली

"मॅडम,
फार घट्ट होताहेत"
तो फणकारला
.....उगाचच काहीतरी कारण

'अरे दुसरे जोड दाखव रे
या साहेबांना'

"हिला स्वत: उठायला काय होतं"
तो विचारात असतानाच

पोर्‍याची धांदल पाहून
ती उठलीच

पण तो मात्र......
'तिने' काढलेला
छानसा नवा जोड
घालून बघण्याआधीच
बदलायला आणलेले बूट घेऊन
केव्हाच परतलेला....
....खालमानेनं.

तर ती...अचंबित....
पण तेच तजेलदार हसू
चेहर्‍यावर लेऊन
पुन्हा गल्ल्यावर....
....दोन्ही पायात घातलेले
जयपूर फुट सावरत.

Tuesday, September 20, 2011

अंतर

एरवी आपल्यातल्या अंतराला
नियतीची क्रूर चेष्टा
म्हटल्यावर...
"पार्ट ऑफ लाईफ आहे,
तक्रार नाही रे कसलीच"
असं धिटाईनं
समजावणारी तू

आणि आज.........
"आपण काय एकमेकांना
'एका हाकेवर' आहोत"
म्हटल्यावर....
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच

आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?

Saturday, September 17, 2011

पावती

तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली

तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली

तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Monday, September 5, 2011

पत्र

तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
आज मात्र
नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय......
अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय

...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?

Tuesday, August 23, 2011

पारिजातक

आठवतं तुला? दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता
एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो
तेव्हा तू हातात हात गुंफुन
थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस
एकत्र चालायचं का रे?

"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
म्हणूनच साद घालते आहे तुला
निव्वळ माझ्यासाठी नव्हे रे
तुझीही तगमग बघवत नाहीये मला

सारे "पण" विसरुन तुझा हात हातात घेतला
ती जागा आणि तो क्षण अविस्मरणीयच
पण वादळ गेलं आणि लाटा पुन्हा शांत झाल्या
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या
आणि....
तो क्षण निसटलाच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तसा

आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय जाणवणारा तो गंध
तुझाच तर आहे!!

Monday, August 15, 2011

देशील का?

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?



Thursday, August 11, 2011

गंध फुलांचा


"गंध फुलांचा" ऐकल्यावर मनात
नेमकं काय दाटायचं
कुणास ठाऊक मला तेव्हा
नेमकं काय वाटायचं
आतून येणारी हाक
त्या हाकेतली आर्त स्पंदनं
याचा ठावच घेतला नव्हता
मनातल्या वादळाचा तेव्हा
अर्थच उमगला नव्हता
येणारी हाक कुणाची होती
की होते ते फक्त मनाचे खेळ?
ती होती का "आशा"च्या आवाजाने निर्मिलेली
एक अगम्य, वेडी आशा.....?
की अव्यक्त भावनांची
हळुवार अमूर्त भाषा?

मग जळमटं बाजूला सारून
जुन्या कपाटातून काढलीच बाहेर
माझ्या आयुष्याची वही
तिची पानं थोडी कोरी
थोडी भरलेली
तुझ्यासमोर ठेवली
तेव्हा सारं काही उमगलं
बांध फोडून मनात दाटलेलं
त्या वहीवर अलगद उमटलं

भरलेल्या पानांना
तुझ्या अक्षराची सोबत झाली
कोरी पानं वाट बघत होतीच
तुझंच अक्षर उमटण्याची
मला न समजलेलं गणित
तुझ्याच अक्षरात सोडवण्याची

जास्त काही लिहीत नाही
एवढंच तुला सांगायचं होतं, यापुढे.....
उघडलेल्या वहीवर अक्षर तुझंच असेल,
एवढंच वचन द्यायचं होतं.





Wednesday, June 15, 2011

रमण लांबा आणि हेल्मेट


क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेता राजा गोसावी यांना आलेला मृत्यू हा एका वेगळ्या अर्थाने सगळ्यात सुदैवी मृत्यू म्हणता येईल. राजा गोसावी यांना तर मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला. पण ही झाली वयोवृद्ध लोकांची गोष्ट.

पण वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी मृत्यू आला तर, आणि ते ही मैदानावरच्या घटनेमुळे? ते मात्र दुर्दैवीच. अशीच गोष्ट आहे भारताचा फलंदाज रमण लांबा याची.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रमण लांबाचे आगमन झाले ते दणक्यातच. ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९८६-८७ सालच्या मालिकेत धडाकेबाज कामगिरी करून तो सगळ्यांच्या नजरेत भरला. पण पुढच्या काही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला. बी.सी.सी.आय. च्या निवड समितीने रमण लांबाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी नंतर अनेक सामन्यांत खेळण्याची संधी दिली, पण त्याचं तो सोनं करु शकला नाही. भारतातील स्थानिक स्पर्धात धो धो धावा करुनही तो पुन्हा संघात स्थान काही मिळवू शकला नाही. त्याची पुन्हा राष्ट्रीय संघात कधीच निवड झाली नाही.
राष्ट्रीय संघातून बाहेर फेकले गेल्यावर आजकाल कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या वृत्तवाहिन्यांवर 'क्रिकेट तज्ञ' म्हणून चमकोगिरी करण्याची सोय त्याकाळी नसल्याने त्याने मग अनेक स्थानिक पातळ्यांवर क्रिकेट खेळायला सुरवात केली. रमण लांबा काही काळ आर्यलंडच्या क्लब क्रिकेटमध्ये काही काळ चमकला. तिथल्याच एका तरुणीशी (किम) त्याचे प्रेमाचे सूर जुळले आणि दोघे लवकरच विवाहबद्ध झाले.



काही काळाने त्याने बांगलादेशातून क्लब क्रिकेट खेळायला सुरवात केली. वंगबंधू स्टेडियम मध्ये अशाच एका क्लब पातळीवरच्या सामन्यात मोहमेडन स्पोर्टिंग या संघाविरुद्ध ढाका येथील अबहानी क्रिडा चक्र या संघातर्फे खेळत असताना सैफुल्ला खान या गोलंदाजाच्या एका षटकादरम्यान रमण लांबाला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करण्यास पाचारण करण्यात आलं. खालीद मसूद या त्याच्या यष्टीरक्षक-कर्णधाराने त्याला हेल्मेटबाबत विचारलं, पण त्या षटकात फक्त तीन चेंडू बाकी असल्याने रमणने हेल्मेट घालायचा कंटाळा केला. आणि त्याच्या ह्याच निर्णयाने घात केला. सैफुल्लाने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा टाकला. त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाज मेहराब हुसेनने पुलचा एक सणसणीत फटका हाणला. चेंडू फार उंचावर उडून झेल पकडला जाऊ नये म्हणून त्याने चेंडू जमीनीवर पडेल अशा बेताने मारला पण तो सरळ रमण लांबाच्या डोक्यावर आदळला. फटका इतका जोराचा होता की चेंडू लांबाच्या डोक्यावर आदळून उंच उडाला, इतका की खालीद मसूदला तो काही अंतर मागे जाऊन झेलावा लागला. फलंदाज बाद झाल्याने सगळे क्षेत्ररक्षक जल्लोष करत खालीदकडे धावले.

त्याच वेळी सगळ्यांचं रमण लांबाकडे लक्ष गेलं तेव्हा तो डोकं धरुन खाली पडलेला दिसला, आणि सगळे त्याच्याकडे धावले, पण लांबा एव्हाना त्या धक्क्यातून सावरला असावा. तो आरामात उठून उभा राहिला आणि "मी बरा आहे" असं क्षेत्ररक्षकांना सांगून ड्रेसिंग रूमकडे आरामात चालत गेला. संघाच्या डॉक्टरने त्याला पाणी पाजले, पण काही वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला इस्पितळात हलवण्यात आलं. तिथे नेलं जात असताना वाटेतच त्याची शुद्ध हरपली. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून मेंदूतली गाठ काढून टाकण्यात आली. प्रकृती खालावल्याने दिल्लीहून एका तज्ञाला पाचारण करण्यात आलं पण तो "आता रुग्ण बरा होण्याची काहीही आशा नाही" असं सांगून जवळ जवळ आल्यापावलीच परत गेला. अखेर उपरोल्लेखित घटनेच्या तीन दिवसांनंतर त्याच्या कुटुंबाच्या परवानगीने त्याचा लाईफ सपोर्ट काढून टाकण्यात आला. बायको किम आणि पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी त्यावेळी लांबाच्या अखेरीचे साक्षीदार होते.

ब्रॅडमनच्या काळात हेल्मेट कसं नव्हतं आणि आज सचिन तेंडुलकर कसं हेल्मेट, आर्म गार्ड, चेस्ट गार्ड पासून कसं सगळं घालून खेळतो याबद्दल उहापोह करणारा (आणि आजकालच्या फ्याशनीप्रमाणे सचिनला नावं ठेवणारा) एका इंग्रजाचा लेख नुकताच वाचनात आला. अनेक कारणांनी त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली, पण त्याला लांबाचा मृत्यू कसा झाला ते अर्थातच ठावूक नसावं. किकेटमधे हेल्मेट हा प्रकार प्रचलित झाल्याला साधारण तीसेक वर्ष झाली असतील. या शिरस्त्राणाने असंख्य फलंदाज आणि क्षेत्ररक्षक जायबंदी होण्यापासून वाचलेले आहेत. जवळजवळ सगळे फलंदाज हल्ली हेल्मेट वापरताना दिसत असले, तरी फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करणारे अनेक खेळाडू आजही एकनाथ सोलकरी थाटात हेल्मेट घालायचा कंटाळा करतात. अशांनी रमण लांबाची दुर्दैवी गोष्ट आठवावी आणि हेल्मेट घालायला सुरवात करावी.

शेवटी 'शीर सलामत तो कॅच पचास' हेच खरं, नाही का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भः विविध वृत्तपत्र कात्रणे, क्रिकइन्फो डॉटकॉम, स्पोर्टस्टार.
रमण लांबाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

वर्षा विशेषांक ’ऋतू हिरवा २०११’ इथे पूर्वप्रकाशित.

Thursday, May 19, 2011

संस्कृत भाषेचे अनोख्या पद्धतीने संवर्धन: हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर

नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.



आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.



ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.



Friday, May 6, 2011

व्यसन

एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.

"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.

"तीनशे साठ."

"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."

"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."

"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."

"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो." ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.

लेखाच्या नावासंदर्भात वरचा संवाद वाचून कदाचित तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. नाही, हा संवाद एखाद्या दारूच्या गुत्त्यावरचा किंवा परमिट रूमबाहेरचा नाही (अर्थात तिथे उधारी चालत असावी असं मला तरी वाटत नाही - अनुभव नाही). हा संवाद आहे एका सायबर कॅफे बाहेरचा. शेजारी एका दवाखान्यात आलो असता कानावर पडलेला. सहज रिसेपशनिस्टला विचारलं तर हे असले प्रेमळ(!) संवाद रोजचेच आहेत असं समजलं. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडलेल्या विद्यार्थीदशेतील मुलांचे आणि सायबर कॅफेच्या गल्ल्यावर बसलेल्यांचे. "अहो काय सांगू, अनेक वेळा समजावून झालं, पेशंट आहेत त्रास होतो, काहीही परिणाम नाही".

असेल अपवादात्मक ठिकाण, म्हणून फार विचार केला नाही. असंच एकदा प्रिंटाआउट काढायला अन्य एका सायबर कॅफे मध्ये जावं लागलं. तिथे अनेक मुलं शालेय गणवेशात बसलेली दिसली. ही मुलं करताहेत तरी काय पहावं म्हणून एकाच्या नकळत सहज डोकावलो तर कसलासा ऑनलाईन युद्धाचा गेम तो खेळत होता. शेजारीच त्याचा मित्र त्याला कसं खेळायचं याचं मार्गदर्शन करताना दिसला. माझं काम झाल्यावर सायबर कॅफेच्या मालकाला विचारलं, "काय हो, दोघांना कसं काय बसून देता तुम्ही एका पी.सी. वर?"

"अहो शेट, लय भारी गिर्‍हाईकं आहेत ही. रोज येत्यात. बराच वेळ बसत्यात, लई खेळत्यात. बक्कळ कमाई यांच्यामुळं" मालक उत्तरले.

निराशेने मान हलवून बाहेर पडलो, तर मागोमाग वरच्यासारखाच संवाद कानावर पडला. उधारी बाकी असल्याचा. फक्त ह्या वेळी रक्कम कमी होती.

मित्रमंडळी आणि अन्य काही सायबर कॅफेचे मालक यांच्याशी चर्चा करता समजलं की ही परिस्थिती धक्कादायकरित्या सर्वसामान्य आहे. कोपर्‍याकोपर्‍यावर कुत्र्याच्या छत्रीसारखे उघडलेले सायबर कॅफे यांमुळे घरी इंटरनेटची जोडणी नसलेले किंवा इतर काही कारणांमुळे घरी गेमींग न करू शकणारे यांची चांगलीच सोय झाली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात जितक्या झपाट्याने तुरडाळीचे दर वाढले त्यापेक्षाही वेगाने घसरलेले सर्फिंगचे दर ही ऑनलाईन गेम्सचं वेड फोफावण्यासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरली आहे. दुर्दैवाने अधिकाधिक लोक ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात सापडत आहेत.


ई-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ म्हणतात की इंटरनेट सहज उपलब्ध असणं या व्यतिरिक्त ऑनलाईन खेळ यांचे अतिशय वेगाने लागू शकणारे व्यसन ही प्रामुख्याने चिंतेची बाब आहे. वैयत्तिक/प्रत्यक्ष आयुष्यात छटाकभर सत्ताही नसलेल्यांकडे ऑनलाईन खेळात मोठ्या सैन्याचे अधिपत्य किंवा एका शहराचे नेतृत्व येऊ शकते. इंग्रजीत असलेल्या ''Power corrupts, and absolute power corrupts absolutely' या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ही नशा ऑनलाईन असली, तरी ही सत्ता मनाचा झपाट्याने ताबा घेते, आणि मग शाळा, शिकवणीची फी, खाऊचे पैसे इत्यादीतला एक मोठा हिस्सा या खेळांवर खर्च होऊ लागतो.

माझा एक प्रोग्रामर मित्र ऑनलाईन खेळ बनवतो. त्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली. ऑनलाईन खेळ बनवणारे मानसशास्त्राचा उत्तमरित्या उपयोग करुन घेतात. प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याचे किंवा मानसिक कणखरतेची कसोटी प्रसंग पाहणारे प्रसंग आले की अशा ऑनलाईन खेळांच्या नादी लागलेल्या लोकांना खेळातल्या विजयाचे प्रसंग आठवून त्यांची पाऊले आपोआप गेमिंगकडे वळतात. मानसशास्त्रात हा प्रकार 'क्लासिकल कंडिशनिंग' या नावाने ओळखला जातो.

हे खेळ काही वेळ खेळून सोडून देण्यासारखे निश्चित नाहीत. ते खेळायचे असतील तर बराच वेळ द्यावा लागतो. खेळात एखाद्या जागी माघार घ्यावी लागणं आणि एखाद्या प्रसंगी जिंकणं यात अशा प्रकारे समतोल साधला जातो की खेळणार्‍यापुढे जिंकण्याचं गाजर सतत नाचवलं जातं. खेळताना आपण नक्की कधी जिंकणार हे सांगता येत नाही. विजय हा अगदी पुढच्या क्षणाला मिळू शकतो, पुढच्या तासात तुम्ही जिंकू शकता, किंवा जिंकायला अगदी दिवसभरही लागू शकतो. पण बराच वेळ हरतोय म्हणून आपण खेळ खेळणं थांबवलं तर तो जिंकण्याचा क्षण गमावू ह्या भीतीने खेळणारे अमर्याद काळ खेळतच राहतात. सतत अनेक तास असे खेळ खेळल्याने ताणामुळे काहींनी आपला जीव गमावल्याचीही उदाहरणं आहेत.

किशोरावस्थेत असलेल्या मुलांत या व्यसनाचा प्रामुख्याने प्रादुर्भाव असला तरी लहान मुलेही याला अपवाद नाहीत. माझ्या एका मित्राची प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी त्यांच्या घरातल्या संगणकावर बार्बी हा खेळ खेळते. त्याबद्दल बोललं असता चिडचिडी होते आणि हट्टीपणा करते. जी मुले बंदुका, तोफा आणि तत्सम गोष्टी असणारे खेळ खेळतात त्यांना राग लवकर येतो आणि अशी मुले हिंसक होण्याची शक्यता असतेच असते.


ही बाब आता फक्त ऑनलाईन खेळांपुरती मर्यादित नाही तर अश्लील मजकूर, चित्रे आणि चलतचित्रे असलेली संकेतस्थळे, चॅटींग आणि सोशल नेटवर्किंग यांनीही या व्यसनाचा मोठा भाग व्यापला आहे. आंतरजालीय जुगार, समभाग खरेदी-विक्री, पोर्नोग्राफी, आणि सेक्स चॅट हे या ई-व्यसनाचे काही घटक.

इंटरनेट उर्फ आंतरजालाचे व्यसन ह्या गोष्टीने आता इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की पुण्यातल्या मुक्तांगण या व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या संस्थेत आता दारू आणि अंमली पदार्थांचे व्यसन याबरोबरच इंटरनेट व्यसनमुक्ती ही एक वेगळी उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. संस्थेत या नवीन व्याधीवर उपचार घेणारी ही सगळी शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आहेत. उपरोल्लेखित अनेक समस्यांबरोबरच सायबर रिलेशनशिप अ‍ॅडिक्शन हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग, आंतरजालावरचे मित्र अशा गोष्टींमुळे वेळ-काळाचे भान न राहिल्याने घरी पालकांशी आणि इतर घरच्यांशी अगदी तुटक किंवा उद्धटपणे संभाषण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधांकडे होणारे दुर्लक्ष, वाचन-लेखन-मनन आणि मैदानी खेळ खेळण्यास अनुत्सुक असणे यासारख्या बाबींकडे घरातल्या मोठ्यांचे एक तर वेळेवर लक्ष जात नाही, किंवा अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. शेवटी सहामाही/वार्षिक परीक्षेत दिवे लागल्यावर प्रगती पुस्तकात दिसणारी अधोगती हा पालकांसाठी एक मोठा धक्का असतो. मग सुरवातीला आपली मुलं संगणक लिलया हाताळतात हा अभिमान गळून पडतो आणि पालकांच्या जीवाला नवीन घोर लागतो. इतर व्यसनग्रस्तांप्रामाणेच आपल्याला व्यसन आहे हेच मुळात या मुलांच्या गावी नसते. मुक्तांगण संस्थेतले समुपदेशक अशा मुलांना हीच गोष्ट आधी पटवून देतात. उपचारांच्या दुसर्‍या टप्प्यात मग त्यांच्या भावी प्रगती बाबत बोलून त्यांना प्रोत्साहित केले जाते. समुपदेशनाबरोबरच ध्यानधारणा, वाचनास उद्युक्त करणे, अशा विविध प्रकारे 'बरे' केले जाते. अडनिडं वय आणि या आजाराचे विचित्र स्वरूप यामुळे या मुलांना ई-व्यसनमुक्त करण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि लागणारा वेळ हा अर्थातच इतर व्यसनाधीन लोकांपेक्षा अधिक असतो. मुलांबरोबरच पालकांचंही समुपदेशन केलं जातं. कारण फक्त मुलांचंच नव्हे तर संपूर्ण घराचं सौख्य आणि शांती अशा गोष्टींमुळे हिरावली जाते. मुलं संगणक वापरत असताना त्यांना विचित्र वाटणार नाही अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवावे असा सल्ला पालकांना दिला जातो.

सद्ध्या मुक्तांगणमधे ई-व्यसनांवर उपचार घेणार्‍यांमधे मुलं आणि तरुणांचे प्रमाण जास्त असलं तरी भविष्यात संस्थेत उपचारासाठी दाखल होणार्‍यांमधे मोठ्यांची संख्या वाढू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. ऑनलाईन नात्यांमधे गुंतल्याने प्रत्यक्ष आयुष्यातल्या नात्यांवर परिणाम होण्याबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातल्या असमाधानकारक नात्यांमुळे अनेक जण ऑनलाईन नात्यांमधे गुंतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. आर्थिक नुकसान, दैनंदिन वेळेचा अपव्यय याबरोबरच ऑफिसमधल्या कामावर परिणाम होणे याही गोष्टी लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. यापायी अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्याचीही उदारहणे आहेत. समविचारी लोकांशी संपर्कात राहणे आणि स्वतःला रचनात्मक पद्धतीने व्यक्त करणे या उद्देशाने आपण अनेक सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांचे सभासदत्व घेतो खरे, पण मग त्याच बरोबर अनेक अनावश्यक गोष्टींमधे आपला सहभाग वाढतो आणि इतर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या मेंदूत प्रवेश करतात. मी आत्ता ज्या आस्थापनात काम करतो तिथे एकेकाळी कर्मचार्‍यांना आंतरजाल मुक्तपणे उपलब्ध होतं. जीमेल, याहू, ऑर्कुट, फेसबुक आणि इतर सगळ्या संकेतस्थळांवर कुठल्याही वेळी सगळयांचा मुक्त वावर असायचा. पण प्रमाणाबाहेर वापर वाढला आणि कामावर परिणाम होऊ लागला तसा हा वेळ नियमबद्ध करुन फक्त दिवसातला अर्धा तास असा केला गेला. आम्हाला निदान सलग अर्धातास मिळतो. अनेक आस्थापनांत हाच वेळ एक तास असला तरी एका वेळी फक्त दहा मिनिटं अशा प्रकारे तो वापरावा लागतो. याचाच अर्थ आंतरजालाचा वापर कसा आणि किती करावा यासंबंधात मोठ्यांनीही आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

इतर काही नाही म्हणून करमणुकीसाठी आंतरजालावर फेरफटका मारायचा याला काही अर्थ नाही. आंतरजाल की करमणुकीची जागा आहे हा समज निखालस चुकीचा आहे. कारण आंतरजाल हे टीव्ही सारखं इडीअट बॉक्स नव्हे. नेटवर बसल्यावर सतत माणसाचा मेंदू जागृत असतो, त्याला आराम मिळत नाही. सतत 'अ‍ॅलर्ट' रहावं लागत असल्याने मग थकवा येणं हे ओघाने आलंच.


मुळात आपल्याला आंतरजालाचे व्यसन लागले आहे ह्याची जाणीव होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. एखादे महत्वाचे काम करण्यासाठी आपण लॉग-इन केले आणि काही क्षणांच्या कामासाठी आलेलो आपण अर्धा-एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन आहोत असे लक्षात आले आहे का कधी? आंतरजालावर सोशल नेटवर्किंगमधे किंवा इतर गोष्टींमधे गुंतल्याने ऑफिसची काही बिनतातडीची कामे पुढे ढकलायची सवय लागली आहे का? वैयत्तिक आयुष्यातले वैफल्य सहन होत नसल्याने त्यापासून पळण्यासाठी तुम्ही आंतरजालावर येता का? या आणि तत्सम अनेक प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर "हो" असले तरी सावध व्हा. एखाद्या संस्थेत जाऊन ई-व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभागी व्हायला कमीपणा वाटत असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवा. 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' हेच सूत्र इथेही उपयोगी पडते. एकदा निग्रह करा, मग वास्तवाशी सामना करणे ही बाब ई-व्यसनांच्या विस्तवाशी खेळ करण्यापेक्षा नक्कीच सोपे वाटू लागेल.

तर मग, करताय ना आजच निश्चय?

Tuesday, May 3, 2011

आणखी एक राधिका

८ मार्च २०११ रोजी सगळा देश - नव्हे - अखिल विश्व जागतिक महिला दिन साजरा करत असतानाच राजधानी दिल्लीत राधिका तन्वर या कॉलेज तरुणीला एका युवकाने गोळी घालून ठार केल्याच्या वृत्ताने सगळा देश हादरला.

"सगळा देश हादरला" असं लिहीण्याची पद्धत असते. कारण असले प्रकार आजकाल इतके सर्वसामान्य झाले आहेत की कुणी हादरत वगैरे नाही. एका सहकर्मचार्‍याची प्रतिक्रिया अगदी प्रातिनिधिक म्हणावी लागेल. "असेल काहीतरी प्रेमाबिमाचं लफडं, सोड यार".

सुदैवाने चार दिवसांत पोलीसांनी यशस्वी(!) तपास करुन खुन्याला अटक केली. विजय उर्फ राम सिंग हा तो खूनी. पोलीसांनी नेहमीच्या पद्धतीने चौदावं रत्न दाखवून त्याची चौकशी केली तेव्हा जे उघड झालं ते समजल्यावर मात्र हा विषय डोक्यातून जाईना.

उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील राम सिंग हा राधिकाच्या घराजवळच असणार्‍या एका शिवणकाम कारखान्यात कामाला होता. राधिकाचा पाठलाग करणे आणि तिला छेडणे हा त्याचा आवडता छंद होता. तसंही मुलींना अशा प्रकारे त्रास देणे हे प्रकार नवीन नव्हते, पण त्याचा राधिकावर विशेष "जीव" असावा. असाच एकदा राधिकाचा पाठलाग करत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतानाच राधिकाने धावत रस्त्यातच उभ्या असलेल्या काही लोकांना गाठले आणि "तो माणूस मला छेडतोय" अशी आरोळी ठोकली. एखादा चोर, मुलींना छेडणारा नि:शस्त्र गुंड असे कोणी तावडीत सापडले की हात साफ करायला लोक टपलेलेच असतात. अर्थातच त्या लोकांनी मग "लडकी को छेडता है" किंवा तत्सम डायलॉग मारत त्याला बेदम चोप दिला. अशा अनेक गोष्टी कानावर आल्याने राम सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आले. असेच काही दिवस गेले पण राम सिंग राधिकाचा पाठलाग करणे आणि तिने स्पष्ट नकार दिल्यावरही तिच्याकडे आपल्या एकतर्फी "प्रेमाची" कबूली देणे सोडेना.

नोकरी गेल्याने राम सिंगने मुंबई गाठली आणि तिथे रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याच्या विकृत डोक्यातून राधिकाचा विचार जाता जाईना. त्याने वारंवार दिल्लीला येऊन राधिकाच्या मागावर राहणे सोडले नाही. एकदा राधिका बस मधून उतरून पादचारी पुलावरून जात असताना पुन्हा त्याने राधिकाला गाठले आणि त्याच्याशी लग्न करण्याची गळ घातली. तिच्याही मनात त्याच्याविषयी 'प्रेमभावना' असल्याचा त्याचा समज होता. तसं बोलून दाखवल्यावर राधिकाने तिथेच त्याच्या श्रीमुखात भडकावली. आता हा आपल्याला त्रास देणार नाही अशा समजूतीत असलेल्या राधिकाला मात्र राम सिंगच्या मनात भडकलेल्या सूडाग्नीची कल्पना कशी असावी?

विजय उर्फ राम सिंगने आपला सूडाग्नी शमवण्यासाठी राधिकालाच संपवण्याचा घाट घातला. त्याने सरळ गुरगाव गाठले आणि तिथून दोन हजार रुपये देऊन एक 'कट्टा' उर्फ गावठि पिस्तूल विकत घेतले. गंमत म्हणावी की दैवदुर्विलास, आपल्या देशात डि.व्ही.डी प्लेअर आणि पिस्तुल या दोन वस्तू एकाच किंमतीत आणि सहजतेने विकत घेता येतात.

पिस्तूल घेऊन पूर्ण तयारीने तो पुन्हा दिल्लीला आला आणि एके दिवशी संधी साधून त्याने राधिकाला गाठले. पुन्हा त्याला झिडकारून राधिकाची पाठ वळताच त्याने खिशातून पिस्तुल काढले. पण लगेच न चालवता जिना सुरू होण्याच्या जराच आधी त्याने तिच्यावर झाडून जिन्यावरुन उतरुन पळ काढला. पुलावर बर्‍यापैकी वर्दळ असल्याने काही क्षण कुणाला काय झाले ते समजेना. ह्याच गोंधळाचा फायदा घेऊन राम सिंग तसाच पिस्तूल हातात घेऊन पळाला आणि दिल्लीच्या गर्दीत दिसेनासा झाला.

पोलीसांनी तिच्या घरच्यांकडे आणि महाविद्यालयातील मित्रपरिवाराकडे आधी चौकशी केली. मग इतर तपास सुरु झाला आणि राम सिंगच्या खोलीत राहणार्‍या मित्रांकडून माहिती मिळाल्यावर तपास वेगाने करुन त्याला मुंबईतून अटक केली. राम सिंगला त्याच्या कृत्याविषयी अजिबात पश्चात्ताप नव्हता "माझी बायको नाही झाली तर आता इतर कुणाचीही होणार नाही" असले विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

मला सर्वात जास्त क्लेषकारक वाटलेली बाब म्हणजे राधिकाच्या घरच्यांच्या चौकशीत पोलीसांना जी धक्कादायक बाब समजली ती होय. असे काही प्रकार अनेक दिवस सुरू असल्याचे राधिकाने तिच्या घरच्यांना सांगितलेच नव्हते! मग त्याचं नावही ठाऊक असणं दूरच राहिलं. राम सिंगला जेव्हा अटकेनंतर तिच्या घरच्यांनी पाहिले तोपर्यंत त्यांनी त्याला त्यांच्या घराच्या आसपास बघितलेही नव्हते!! राधिकाने जरी फक्त तिच्या घरच्यांना 'एक माणूस आपला पाठलाग करत असतो आणि आपल्याला छेडत असतो" असं नुसतं सांगितलं असतं तरी पुढची कारवाई करुन पुढची अप्रिय घटना टाळता आली असती.

हे समजल्यावर मनात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उठले. असे का झाले असावे? याला घरचे वातावरण कारणीभूत असावे का? शक्य आहे. कारण असले प्रकार घडल्यावर "तुझीच काहीतरी चूक असेल" अशी मुक्ताफळे उधळणारे पालक आहेतच की. मुलांना आई-वडीलांची इतकी भीती वाटावी, की छेडछाड आणि पाठलागासारख्या गंभीर बाबीही त्यांना सांगायला संकोचावे? मुलांना - आणि विशेषतः मुलींना) धाकात ठेवण्याच्या प्रयत्नात आपण त्यांना आपल्यापासून दूर करत आहोत ह्याची जाणीव पालक म्हणून आपल्याला राहिली नाही असे झाले आहे का? मुले आणि आई-वडील/एकूणच घरातले यांच्यातला संवाद इतका हरवत चालला आहे का, की आपल्या अब्रू आणि जिवाला असलेल्या धोक्याबाबतही घरच्यांशी बोलावेसे मुलांना वाटू नये? की राधिकाला वाटलं तशी ही बाब गांभीर्याने घेण्याजोगी वाटत नाही अनेक मुलांना? बाहेर घडणारं सगळं आपल्या आई-वडिलांना सांगणारी मुले आहेत, मान्य. पण अगदी काहीच न बोलणारी, थोडंच सांगणारी, किंवा नेमकं महत्वाचं तेच न सांगणारीही मुलं आहेतच की.

विकृत मंडळी जागोजागी असणारच, पण मग मुले असले प्रकार घरी का सांगत नसावीत? काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनात निर्माण करण्यात अपयशी ठरतोय का?

अशा अनेक राधिका या आधी झाल्या आहेत. पुढेही होतील. पण मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने — जेणेकरुन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकता येतील — आपल्याला काय करता येईल?

Tuesday, March 29, 2011

चित्रपट परिचय - ४ | जूनो: सुंदर पटकथा, संयत अभिनय, उत्तम दिग्दर्शन

काही विशिष्ठ संवेदनशील विषय असलेल्या चित्रपटांवर चर्चा करणं मी सहसा टाळतो. पण अशाच एका विषयावर बनलेल्या एका उत्तम चित्रपटाने अखेर माझी ती सवय मोडली. अमेरिकेत सर्रास आढळणार्‍या आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणार्‍या आपल्या भरकटलेल्या भारतीय तरुण पिढीपर्यंत ते लोण पसरण्याचा धोका असलेला तो विषय म्हणजे पौगंडावस्थेतील गर्भधारणा अर्थात टीनएज प्रेग्नंसी.

सुदैवाने हा प्रकार समाजमान्य नसल्याने आजपावेतो आपल्याकडे ह्या विषयावर चित्रपट निघालेले नाहीत. पण ज्या पद्धतीने आणि वेगाने वैयत्तिक स्वातंत्र्याचा अर्थ हा अनिर्बंध स्वैराचार असा लावण्यात येऊन नैतिक, संस्कृतिक अध:पतन होत आहे, त्याच प्रकारे हे सगळं सुरू राहिल्यास चित्रपट काढण्याइतका हा प्रकार भारतात बोकाळेलच यात संशय नाही.


जूनो (Juno) हा नितांतसुंदर चित्रपट नुकताच सोनी पिक्स वर बघितला. आधी विषय लक्षात आल्यावर दुसरी वाहिनी लावायला रिमोटकडे हात गेलाच होता, पण जे. के. सिमन्स (बर्न आफ्टर रिडींग मधला सी.आय.ए. अधिकारी) या अभिनेत्याला बघून उत्सुकता निर्माण झाली आणि चित्रपट पूर्ण बघायचा निर्णय घेतला. सुदैवाने तो योग्य ठरला.

नर्मविनोदी अंगाने जाणार्‍या या चित्रपटाची सुरवातच शोडषवर्षीय नायिका जूनो (एलन पेज) हिला आपण गरोदर असल्याचा साक्षात्कार होण्यात होते. तिचा नुकताच दुरावलेला बॉयफ्रेंड पॉली ब्लीकर (मायकल सेरा) हाच त्या होणार्‍या मुलाचा बाप असल्याचंही तिच्या लक्षात येतं. वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत हा प्रकार सर्रास असल्याने फारशी बावचळून न जाता जूनो घडल्या प्रकाराला 'आलिया भोगासी असावे सादर' या न्यायाने सामोरी जाण्याचं ठरवते. आपण आई व्हायला अजून तयार नसल्याची तिला सुदैवाने जाणीव असल्याने आणि तिच्या दृष्टीने होणारं मूल ही एक नसती ब्याद असल्याने जूनोच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे गर्भपात करुन या कटकटीपासून सुटका करुन घेण्याचा. पण लवकरच तो विचार जूनो बाजूला सारते आणि ह्या मुलाला जन्म देऊन एका मूल नसलेल्या जोडप्याला दत्तक देऊन सुखी करण्याचा निर्णय घेते.

आपण केलेला प्रकार आणि आपला मूल दत्तक देण्याचा निर्णय आधी आपली मैत्रिण लिया (ऑलिव्हिया थर्लबी) हिला सांगते आणि मग आपल्या आई-वडीलांच्या कानावर घालते. जूनो लियाच्या साक्षीने तिच्या वडिलांना आणि सावत्र आईला कबुली देते तो प्रसंग फारच गंमतीदार आहे. आपल्या अवघ्या सोळा वर्षाच्या पोरीने चक्क गरोदर रहाण्याचा पराक्रम केलेला आहे या धक्क्यापेक्षा चक्क "चला, मला वाटलं ही ड्रग्स वगैरे मधे अडकली की काय" असं म्हणून तिचे वडील मॅक (जे. के. सिमन्स) सुटकेचा नि:श्वास टाकतात.
आता जूनोने निर्णय घेतल्यावर तिच्या घरातले सगळेच तिला मदत करायला मनात अजिबात किंतु न ठेवता पुढे येतात. अगदी तिच्या सावत्र आई सकट. मात्र तिला आधार देत असतानाच तिने केलेल्या घोडचुकीची आणि तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव तिला करुन द्यायला ते विसरत नाहीत. जुनो तिच्या वडिलांबरोबर त्या मूल दत्तक घेऊ इच्छिणार्‍या जोडप्याला म्हणजेच मार्क (जेसन बेटमन) आणि व्हेनेसा (जेनिफर गार्नर) या दोघांना भेटते आणि पहिल्याच भेटीत क्लोज्ड अ‍ॅडोप्शन (closed adoption) चा प्रस्ताव मांडते. क्लोज्ड अ‍ॅडोप्शन म्हणजे बाळ एकदा दत्तक गेल्यावर त्याच्या पुढच्या प्रगतीबद्दल कुठलीही माहिती खर्‍या आईला मिळणार नाही असा करार.

यानंतर जूनोचं त्या घरी जाणं-येणं वाढतं आणि ती लवकरच व्हेनेसा आणि मार्कचा विश्वास संपादन करते. जुनो व्हेनेसाला तिच्या बाळाशी बोलायला प्रोत्साहन देऊन आपलीशी करते आणि रॉक संगीताच्या मुख्य समान आवडीमुळे मार्कचीही मैत्री संपादन करते.



बाळाचा पिता(!) असलेला पॉली ब्लीकर याच्या विषयी मनात असणार्‍या भावनांबाबत मात्र तिच्या मनात बर्‍यापैकी गोंधळ असतो. त्याने प्रॉमला दुसर्‍या मुलीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजल्यावर मात्र तोपर्यंत त्याच्याशी फटकून असणारी आणि अंतर ठेऊनच वागणारी जूनो त्याच्यावर भडकते. पॉली मात्र कमालीचा संयम बाळगत लांब रहाण्याचं तिनेच सुचवल्याचं तिला शांतपणे सांगतो आणि वर तिचा मानसिक गोंधळही अधोरेखित करतो. याची परिणिती जूनो अंतर्मुख होण्यात होते.


ब्रेनने दिलेला सल्ला न मानता जूनो मार्कला तो घरी एकटा असतानाही भेटतच रहाते आणि या भानगडीत मार्क तिच्यात कधी गुंतत जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. अशाच एका भेटी दरम्यान तो व्हेनेसाला सोडणार असल्याचं जुनोला सांगतो आणि जुनोवरचं प्रेम अप्रत्यक्षरित्या व्यक्त करतो. त्याच सुमारास तिथे आलेल्या व्हेनेसाला तो त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात बाप होणे हा एक अडथळा आहे आणि अजून पितृत्व स्वीकारायला तयार नसल्याचं सांगून दु:खी करतो.

आपलं मूल एका गरजू पण समजूतदार आणि सुखी कुटुंबाला देऊन निश्चिंत होण्याची स्वप्नं बघत असलेल्या जूनोला या प्रकाराने प्रचंड धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. काही वेळाने मात्र परत येऊन ती फक्त व्हेनेसासाठी एक चिठ्ठी दारात ठेवते, ज्यात ती लिहीते, "व्हेनेसा, तू अजूनही (दत्तक घायला) तयार असलीस तर मी ही (मूल द्यायला) तयार आहे — जूनो" (Vanessa: If you're still in, I'm still in. — Juno).

पुढे काय होतं? मार्कपासून विभक्त झाल्यावर सिंगल मदरच्या रुपात बाळाचं संगोपन करायला सज्ज होऊन जूनोचं मूल व्हेनेसा खरंच दत्तक घेते की ती जबाबदारी शेवटी जूनोलाच उचलावी लागते? पॉली आणि जूनो पुन्हा एकत्र येतात, की जूनो बाळंत झाल्यावर ते ही विभक्त होतात? या प्रश्नांची उत्तरं इथे सांगण्यात काहीच हशील नाही. ती मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.


हा चित्रपट मला आवडण्याची कारणे अनेक आहेत. सामान्यत: पाश्चात्य भयपटात जजमेंट डे, गॉड, एंजल, सेटन, डीमन्स, टेस्टामेंट, जुडास, जीवन हे ईश्वराने दिले आहे त्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार मानवाला नाही (संदर्भ: गर्भपात, देहदंड) वैगरे अनेक ख्रिस्ती धार्मिक संदर्भ उघडपणे येतात, तर काही चित्रपटांत हेच संदेश छुप्या रीतीने दिले जातात. मला तरी ह्या चित्रपटात उघड काय किंवा छुपा काय, असले कसलेही संदर्भ जाणवले नाहीत आणि हीच बाब माझ्या दृष्टीने ह्या चित्रपटाचं एक महत्वाचं बलस्थान आहे. २००७ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा काही छिद्रान्वेषी समीक्षकांनी जूनोने गर्भपाताचा निर्णय रद्ध करणे या एका गोष्टीमुळे हा चित्रपट चक्क छुपा धर्मिक संदेश देत असल्याचे आरोप केले होते म्हणे. मुळात या चित्रपटात नायिका जुनोच्या मनात गर्भपात करण्याचा विचार येणे आणि तो ती ज्या कारणामुळे टाळते ते कारण लक्षात घेता ही टीका अनाठायी असल्याचं सहज लक्षात येतं.

त्यातलं मुख्य म्हणजे असा संवेदनशील विषय उत्तमरित्या आणि अत्यंत नि:पक्षपातीपणे हाताळण्यात निर्माता जॉन माल्कोविच आणि दिग्दर्शक जेसन राईट्मन आणि त्यातले अतिशय गुणी कलाकार यशस्वी झाले आहेत. यात लेखिका डायाब्लो कोडी हिच्या सशक्त पटकथेचा सिंहाचा वाटा आहे.

विषय हाताळला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल, कारण गर्भपात आणि टीनएज प्रेग्नंसी या दोन्हीबद्दल चित्रपटात कुठल्याही प्रकारचं - विरुद्ध किंवा समर्थनार्थ - भाष्य करण्याचं संपूर्णपणे टाळलेलं आहे. एलन पेज, जे. के. सिमन्स, मायकल सेरा, अ‍ॅलिसन जॅनी, जेनिफर गार्नर इत्यादी कलाकारांनी कमालीच्या पोक्त आणि संयत अभिनयाने पात्रांची मानसिक आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अत्यंत ताकदीने पार पाडलं आहे.

इथे थोडं जूनोची सावत्र आई या व्यक्तिरेखेवर बोलण्याचा मोह आवरत नाहीये. ब्रेन ही जूनोला नेहमी आधारच देताना दिसते. अगदी इस्पितळात सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरणीला झापण्यापासून ते मार्कला - म्हणजेच एका लग्न झालेल्या पुरुषाला - वारंवार न भेटण्याचा पोक्त सल्ला जुनोला देण्यापर्यंत तिचं जूनोवरचं प्रेम दिसतं (ब्रेन म्हणते: "You don't understand the dynamics of marriage"). या चित्रपटाचा कधी हिंदी किंवा मराठी अवतार निघाला तर सावत्र आई खूप म्हणजे खूपच फुटेज खाणार हे निश्चित!


पॉली आणि जूनो ह्यांच्यातलं नातं कसं फुलत जातं ते बघणं हा एक प्रसन्न अनुभव आहे. किंबहुना त्यांचा पोक्तपणा आपल्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जातो. आपल्या पोरीला तिच्या चुकीची जाणीव करुन देतानाच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जूनोचे आई-वडील ब्रेन आणि मॅक, व्हेनेसाला सुरवातीला जूनोबद्दल वाटणारा स्वाभाविक अविश्वास आणि त्याचं दाट मैत्रीत झालेलं रूपांतर, तसंच मार्क पासून विभक्त झाल्यावरही जूनोचा निश्चय बघून मूल दत्तक घेण्याच्या आपला निर्णयावर ठाम असणारी व्हेनेसा ह्या गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करुन जातात.

हा चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांच्या यादीत केव्हाच जमा झाला आहे. जूनो तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री देतो. बघा आणि ठरवा.....आणि आवडला तर सांगायला नक्की विसरू नका.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


संदर्भ: कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया.
सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*


या आधीचे लेख:
चित्रपट परिचय - ३ | इनटॉलरेबल क्रुएल्टी: घट(हास्य)स्फोटांची गोष्ट
चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव
चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?) 

Wednesday, March 16, 2011

आयचाघोरसचा सिद्धांत

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)